नवी मुंबई : सरकारने आठ महिन्यांपूर्वी दिलेली आश्वासने हवेत विरली असून आता संयम सुटला आहे. येत्या ५ मार्च रोजी राज्यभरातून एक लाखाहून अधिक वाहने मुंबईतील आझाद मैदान येथे धडकतील. जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर त्याच दिवशी मध्यरात्रीपासून संपूर्ण महाराष्ट्र बेमुदत बंद केला जाईल, असा इशारा महाराष्ट्र ट्रान्सपोटर्स ॲक्शन कमिटीने दिला आहे. या आंदोलनाला ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्याने आंदोलन देशव्यापी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
गुरुवारी दुपारी एपीएमसी येथील माथाडी भवनात राज्यातील विविध ट्रान्सपोर्ट संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मुंबई बसमालक संघटनेचे अध्यक्ष हर्ष कोटक आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ४० हजार रुपयांच्या वाहनावर ८० हजारांचे ई-चलन लादले जात आहे. हे अन्यायकारक ओझे वाहतूकदारांनी कसे सहन करायचे? सरकार आम्हाला शेतकऱ्यांसारख्या आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे करत आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही दहा वेळा सरकारची भेट घेतली; मात्र पदरात फक्त आश्वासनेच पडली. आता चर्चा नाही, थेट कृती होईल. ५ तारखेला महाराष्ट्र थांबणार, असा इशाराही त्यांनी दिला.
५ मार्च रोजी प्रशासनाने वाहने अडविल्यास ज्या ठिकाणी वाहने रोखली जातील, तेथेच ती सोडून देऊन रस्ते जाम करण्यात येतील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
कायद्यानुसार ९० दिवसांत प्रकरणे न्यायालयात न पाठवल्यास ती रद्द करावीत, ही तरतूद पाळली जात नसल्याचा आरोप करण्यात आला. तसेच आठ महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल अद्याप जाहीर का झाला नाही?, असा सवालही उपस्थित करण्यात आला.
हे केवळ ट्रान्सपोर्टर्सचे आंदोलन नसून सर्वसामान्य वाहनचालकांचेही आंदोलन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ई-चलन व जाचक नियमांचा फटका रिक्षा, टॅक्सी, बस तसेच खासगी कार चालकांनाही बसत आहे. त्यामुळे हे जनआंदोलन असून सर्व नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सीमा तपासणी नाके बंद करण्याची घोषणा होऊनही तेथे वसुली सुरूच असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. आजपासून प्रत्येक वाहनावर निषेधाचे पोस्टर व काळे झेंडे लावण्यात येणार असून प्रत्येक वाहतूकदार निषेधाची टोपी घालून आपला विरोध नोंदवेल.प्रसन्न पटवर्धन, अध्यक्ष बोकी संघटना