मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीत लक्षणीय यश मिळाल्यानंतर आता महायुतीने आपला मोर्चा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे वळविण्याचे ठरविले आहे. राज्य भाजपने शिर्डीत दोन दिवसांच्या अधिवेशनाचे आयोजन केले असून त्याची शनिवारी सुरुवात झाली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी अधिवेशनाला हजर राहणार असून जवळपास भाजपच्या १५ हजार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी मंत्री, राज्यातील पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष आणि राज्य मोर्चाचे प्रमुख यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणी विनोद तावडे, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण हे सर्व निमंत्रितांसह बैठकीला हजर होते.
संघटना अधिकाधिक बळकट करण्याबाबतच्या चर्चेवर या वेळी भर देण्यात आला. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजपचा युवकांचा संघटनेत अधिकाधिक सहभाग करून घेण्याचा मानस आहे. सक्रिय राजकारणात युवकांचा सहभाग, रणनीतीबाबत चर्चा, युवकांच्या सहभागासाठी ठोस पावले उचलणे यासंदर्भातील ठराव मांडण्यात येणार आहे आणि त्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निश्चितच लाभ होईल, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.