महाराष्ट्र

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक शस्त्रे जप्त करण्यास सुरूवात; राज्यातून २३ हजार ९७८ शस्त्रे जमा 

निवडणुकीत कुठलेही गालबोट लागू नये यासाठी परवानाधारक शस्त्रे ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे.

गिरीश चित्रे

मुंबई : निवडणुकीत कुठलेही गालबोट लागू नये यासाठी परवानाधारक शस्त्रे ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे. १५ ऑक्टोबर ते आतापर्यंत राज्यभरातून २३ हजार ९७९ शस्त्रे जमा करण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. 

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विधानसभा निवडणूक निर्विघ्न पार पडावी यासाठी राज्य निवडणूक आयोग, पोलिसांसह संबंधित यंत्रणा ॲलर्ट मोडवर आहेत. राज्यात आचारसंहिता लागू होताच आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात येत असून पोस्टर्स बॅनर्स हटवण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याचप्रमाणे राज्यात परवानाधारक शस्त्र जमा करण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत. त्याबाबत ही कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. 

राजकारणी असो की, मोठे व्यावसायिक याशिवाय विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी यांच्याकडून स्वरक्षणासाठी शस्त्र परवाना काढला जातो. हा शस्त्र परवाना जिल्हा प्रशासन व पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत गृह विभागाच्या परवानगीने दिले जातात. मात्र निवडणूक काळात परवानाधारकांना आचारसंहिता संपेपर्यंत शस्त्र जमा करावी लागतात. निवडणूक काळात राजकीय वादविवाद, वैमनस्य उफाळून येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे निवडणूक काळात कायदा-सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परवानाधारकांना शस्त्र जमा करणे बंधनकारक आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील परवानाधारकांकडून शस्त्र जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, काही अपवादात्मक बाब असल्यास परवानाधारक शस्त्र जमा करण्यात येत नसल्याचे निवडणूक विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

Nirmala Sitharaman : GST कपातीचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहचले

'तो' GR रद्द करण्याची जबाबदारी आता भुजबळांची; विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

'ती' नावे तात्पुरती चिन्हांकित करणार; दुबार मतदारांबाबत राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण मागितले

पुनर्विकास प्रकल्पास उपनिबंधकाचे 'ना-हरकत प्रमाणपत्र' अनावश्यक; ७९ (अ) अंतर्गत मुरलेल्या भ्रष्टाचाराला उच्च न्यायालयाचा सुरुंग

औरंगाबाद रेल्वे स्टेशन आता 'छत्रपती संभाजीनगर'