वाढवणसाठी भूमिपुत्रांना प्राधान्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पालघरवासीयांना ग्वाही Devendra Fadanvis / X (@Dev_Fadnavis)
महाराष्ट्र

वाढवणसाठी भूमिपुत्रांना प्राधान्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पालघरवासीयांना ग्वाही

देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून ओळख असलेले वाढवण बंदर तयार करण्यापूर्वी पालघर जिल्ह्यातील मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवांवर कोणतीही गदा येऊ नये, त्यांना पारंपारिक पद्धतीने मच्छीमारी करता यावी अशा अटी टाकून वाढवण बंदराचे काम सुरू करण्यात आले होते.

Swapnil S

डहाणू : देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून ओळख असलेले वाढवण बंदर तयार करण्यापूर्वी पालघर जिल्ह्यातील मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवांवर कोणतीही गदा येऊ नये, त्यांना पारंपारिक पद्धतीने मच्छीमारी करता यावी अशा अटी टाकून वाढवण बंदराचे काम सुरू करण्यात आले होते. तसेच वाढवण बंदरामुळे जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधीत स्थानिक भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर येथील जाहीर सभेत प्रतिपादन केले.

वाढवण बंदरामुळे १० लाख रोजगाराची निर्मिती पालघर जिल्ह्यात तयार होणार आहे. मात्र यावेळी देखील आपण रोजगारामध्ये प्रथम प्राधान्य स्थानिक भूमिपुत्रांना मिळाले पाहिजे, तरुण-तरुणींना मिळाले पाहिजे मग इतरांना अशी अट टाकली होती. याकरिता स्थानिक भूमिपुत्रांना प्रशिक्षण देणे सुरू झाले असून प्रशिक्षित भूमिपुत्रांची फौज लवकरच पालघर जिल्ह्यात तयार होणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी प्रतिपादन केले.

पालघरमधील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक, खासदार डॉ. हेमंत सवरा, इतर आमदार व मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री पालघर दौऱ्यानिमित्त आले असता, त्यांनी विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही प्रमुख नेत्यांचाही समाचार घेतला. मी कोणावरही टीका करण्यासाठी आलो नाही, सकारात्मक विकासावर बोलण्यासाठी आलो आहे. पालघर हा आदिवासी जिल्हा असला, तरी आता त्याचे स्वरूप बदलत आहे. हा जिल्हा पर्यटनाच्या नकाशावर येतो. वाढवण बंदर येथे होत आहे. त्यामुळे दहा लाख भूमिपुत्रांना रोजगार मिळणार आहे आणि हा रोजगार काढून घेण्यात कुणी प्रयत्न केला, तर मुख्यमंत्री म्हणून मी स्वतः पुढे येईन. त्याचबरोबर येथे आपण विमानतळ करत आहोत. चौथी मुंबई पालघर जिल्ह्यातच विकसित होत आहे. डहाणूचे नैसर्गिक सौंदर्य जपताना येथे खंडीत झालेला विकासही आपल्याला पुन्हा सुरू करायचा आहे.

डहाणूतील अतिक्रमणे नियमित करून बेघर लोकांना पंतप्रधान आवास योजनेतून घर द्यावे लागेल. यासाठीच्या सर्व योजना भरत राजपूत यांच्या माध्यमातून आपल्याला राबवता येतील. डहाणूच्या चीकूची निर्यात त्यांच्याच माध्यमातून सुरू झाली. आता येथे आपल्याला बाजार समिती सुरू करायची आहे. डहाणूच्या विकासाला गती द्यायची आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करायची आहे, कचऱ्यापासून खत तयार करायचे आहे." अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

यावेळी गणेश नाईक यांनी चारही नगरपालिकांवर भाजपचे नगराध्यक्ष असतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचा असेल असा इशारा दिला. तर रवींद्र चव्हाण यांनी राज्यात एक विचारच सरकार असून स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी, विकासात्मक कामांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी एक विचारच सरकार येणं गरजेच आहे. भाजपचे सरकार असे म्हणत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वतंत्र लढण्याचा इशारा दिला.

पालघरचा महानगरपालिका करण्याचा विचार

वेगाने होत असलेल्या पालघर जिल्ह्याच्या विकासाबाबत बोलताना मुख्यमंत्री यांनी पालघर नगर परिषदेवर विकासाचा भार वाढत आहे. त्यामुळे लवकरच पालघरचे महानगरपालिकेमध्ये रूपांतर करावे लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली. असे केल्यास पालघर जिल्ह्याला सर्व सोयी मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

रावणाची लंका जाळण्याचे काम आम्ही करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “आम्ही प्रभू श्रीरामाला मानणाऱ्या पक्षात असून आमचा उमेदवार देखील ‘जय श्रीराम’वाला आहे. त्यामुळे आम्ही लंकेत राहत नसून लंका जाळण्याचे काम करणार आहोत. आपला पक्ष हा प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन चालणारा आहे आणि ‘भरत’ हे तर प्रभू श्रीरामांच्या भावाचे नाव आहे. त्यामुळं विरोधकांच्या रावणाचे दहन आपलाच भरत करेल,” असा पलटवारही त्यांनी केला.

मालमत्ता कर न भरणे पडले महागात; ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी ४८३ वर जप्तीची कारवाई; २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित

Maharashtra Weather : राज्यात हवामान बदलाची चिन्हे; कडाक्याच्या उन्हानंतर 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा

Navi Mumbai : एलपीजी टंचाईमुळे सानपाडा गॅस एजन्सीसमोर नागरिकांची झुंबड; सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा; Video

Mumbai : अधिवेशनादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती