मुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारने राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी सुरू केलेली मोफत साडीची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुंडाळली आहे. वस्त्रोद्योग विभागाने गुरुवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.
मोफत साडीची योजना सन २०२६-२७ या आर्थिक वर्षापासून बंद करण्यात येत असल्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे.
शिंदेंच्या नेतृत्वातील सरकारने आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा, वयोश्री, ज्येष्ठ नागरिक तीर्थाटन, शेतकऱ्यांसाठी एक रुपयांत पीकविमा अशा अनेक लोकप्रिय योजना जाहीर केल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व योजना एकापाठोपाठ बंद केल्या. आता अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी सणाच्यावेळी दरवर्षी एक साडी देण्याची योजनाही बासनात गुंडाळण्यात आली आहे.
कालावधी पूर्ण होण्याआधीच योजना बंद
योजनेच्या अंतर्गत राज्य यंत्रमाग महामंडळाने १ साडी ३५५ रुपयांना खरेदी केली. तसेच या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमालीसाठी येणारा खर्च महामंडळाला राज्य सरकारकडून देण्यात आला. ही योजना २०२३ ते २०२८ अशा पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आली होती. मात्र, योजेनचा कालावधी पूर्ण होण्याआधीच ती बंद करण्यात आली.