संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

राज्यात ३ दिवस मुसळधार! मुंबई, ठाणे, पुण्यासह कोकण, विदर्भ, मराठवाड्याला झोडपणार; रेड-यलो-ऑरेंज अलर्ट जारी

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. भारतीय हवामान विभागाने राज्याला पुढील ३ दिवस तुफान पावसाचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्याला सोमवारी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Krantee V. Kale

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. भारतीय हवामान विभागाने राज्याला पुढील ३ दिवस तुफान पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राला ९ जुलैपर्यंत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे.

कोकण किनारपट्टीवर असलेल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्याला सोमवारी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पालघर, ठाण्याला ऑरेंज अलर्ट

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिकचा घाटमाथा, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. तर मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पालघरमधील सर्व शाळा सोमवारी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिकमध्ये धुव्वाधार

दरम्यान, हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर पालघर, रायगड जिल्ह्यासह नाशिकमध्ये रविवारी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. नाशिकमधील गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत होती. यावेळी नदीपात्रातील रामकुंड परिसरात दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी वाहत होते. रामकुंडात अडकलेल्या एका तरुणाला बचाव पथकाने सुरक्षितपणे बाहेर काढले. गंगापूर धरणातून ४ हजार ६५६ क्युसेक वेगाने गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे गोदावरी नदीत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. नाशिकमधील सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना प्रवेशास मनाई करण्यात आली. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. रविवारी सुट्टीमुळे धबधब्याच्या परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त आणि गृहरक्षक दलाचे जवान तेथे तैनात करण्यात आले आहेत.

Mumbai : लोकल प्रवासात फेरीवाल्यांची अधिकृत एन्ट्री? पश्चिम रेल्वेकडूनही हालचाली सुरू; मात्र प्रवाशांकडून तीव्र विरोध

RBIच्या कारवाईनंतर Paytmचे स्पष्टीकरण; ॲप आणि UPI सेवा सुरूच राहणार, वाचा सविस्तर

Mumbai : पालिकेचे २००० सालाआधीचे, नंतरचे फोटोपासही ग्राह्य धरणार; पात्रता सर्वेक्षणातील ‘अनिर्णित’ धारावीकरांना मोठा दिलासा

मेहता-सरनाईक वाद चिघळला; सर्व तक्रारींची सखोल चौकशी करा, परिवहन मंत्र्यांचे आयुक्तांना पत्र

दूध भेसळ रोखण्यासाठी AIचा वापर करा; मुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाला सूचना