मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचे धोरण अवलंबण्याचे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्रातील मंत्री व उच्चपदस्थांचे दौरे रद्द झाले आहेत. प्रशासनात आणि मंत्र्यांच्या कामकाजातही अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
आता जिल्हाधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना विनाकारण मुंबईत पाचारण करण्याऐवजी ऑनलाइन बैठकांवर भर दिला जाणार आहे. जपानमधील दोन राज्यांच्या राज्यपालांच्या निमंत्रणावरून तेथील नियोजित आमदारांचा १२ सदस्यीय अभ्यास दौरा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रद्द केला आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आपला नियोजित लंडन, पॅरिस आणि ॲमस्टरडॅमचा कौटुंबिक दौरा राष्ट्रीय हितासाठी रद्द केला आहे.
आता मंत्र्यांना अधिकृत कामासाठी विमान वापरण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. तसेच केवळ तातडीच्या कामांसाठीच विमानाचा वापर केला जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहे. मात्र, विमानाचा वापर केवळ तातडीच्या स्थितीतच केला जातो. मी स्वतः गेल्या वर्षभरात फक्त ४-५ वेळाच विमानाने प्रवास केला आहे. आमचे मंत्री विनाकारण प्रवास करत नाहीत. आता मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेशिवाय विमान प्रवास न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत’, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.