पुणे : संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापलेला असला तरी, गेल्या दोन दिवसांच्या वृष्टीनंतर पावसाने काहीशी ओढ दिली असून जुलैच्या सुरुवातीलाच त्याचा जोर वाढणार आहे.
मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या ऊन पडले असून, पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र दिसत आहे, कारण सध्या अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात कोणतीही मोठी हवामान प्रणाली किंवा कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले नाही. मात्र, ही विश्रांती केवळ काही दिवसांची असून, २८ जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होईल आणि १ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
२८ आणि २९ जून रोजी पावसाचा जोर पुन्हा वाढण्यास सुरुवात होईल, ज्यामध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड आणि कोकणातील सर्व जिल्ह्यांचा समावेश असेल. अहिल्यानगर आणि बीडमध्येही पावसाचा अलर्ट देण्यात आला असून उत्तर व दक्षिण मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस अपेक्षित आहे.
मुंबईत १ ते ५ जुलै मुसळधार पाऊस
१ ते ५ जुलै या कालावधीत मुंबईत ३५० ते ४५० मिमी पावसाची शक्यता असल्याने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे पुनरागमन होईल.