सौजन्य (एक्स) प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

राज्यात रस्ते अपघातात वाढ; तीन महिन्यांत ९,३८५ अपघातांत १८०० लोकांचा मृत्यू

राज्यात रस्ते अपघातात वाढ होत असून जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत राज्यातील विविध महामार्गांवर ९,३८५ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातात १,८५६ लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गिरीश चित्रे

मुंबई : राज्यात रस्ते अपघातात वाढ होत असून जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत राज्यातील विविध महामार्गांवर ९,३८५ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातात १,८५६ लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे रस्ते अपघात टाळण्यासाठी डेंजर स्पॉटचा शोध घेणे, रस्ते सुरक्षेसाठी उपाययोजनांची अंमलबजावणी होते की, नाही यावर लक्ष ठेवणे अशा विविध उपाययोजना सुचवण्यासाठी रस्ते सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र एप्रिल २०२३ नंतर रस्ते सुरक्षा समितीची बैठक झाली नसल्याने समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्यातील वाहतूककोंडी फोडण्यासह लोकांचा प्रवास जलदगतीने व्हावा यासाठी महामार्ग बांधले जात आहेत. समृद्धी महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-नागपूर एक्स्प्रेस हायवे असे एकूण १८ हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग आहेत. महामार्ग बांधल्याने वेळ व पैशांची बचत होते. मात्र महामार्गाचे काम होत असताना रस्ते अपघात कसे टाळता येतील, याकडे विशेष लक्ष देण्यात आलेले नाही. त्यामुळे रस्ते अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. मात्र काही अपघात हे वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे होत असतात, असे निदर्शनास आल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.

रस्ते सुरक्षा समितीला बैठकीचा मुहूर्त मिळेना

अपघात टाळण्यासाठी, उपाययोजना सुचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मे २०१५ मध्ये रस्ते सुरक्षा समिती स्थापन केली आहे. या समितीचे प्रमुख परिवहन मंत्री असतात. ही समिती रस्ते अपघातावर नियंत्रण मिळवणे, अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना करणे उपयुक्त ठरेल अशा विविध सूचना करते. मात्र राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ होत असून मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे. मात्र या समितीची एप्रिल २०२३ नंतर बैठक झालेली नाही. त्यामुळे समितीच्या कामकाजावरच प्रश्न निर्माण करण्यात येत आहे.

दरम्यान, रस्ते सुरक्षा समितीचे चेअरमन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मोबाईलवर संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत.

Bihar Election Results 2025 Live Updates: एनडीए २०० च्या पार; "ही ज्ञानेश कुमार यांची जादू"; काँग्रेसच्या भूपेश बघेल यांची टीका

Assembly Bypolls Result 2025 : अंतापाठोपाठ जुबली हिल्समध्येही काँग्रेसचा दमदार विजय; बघा अन्य ६ जागांवर कोणाची बाजी?

सुवर्णकाळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन; ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Red Fort Blast : दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरणी मोठी कारवाई; मास्टरमाईंडचे घर सुरक्षा दलाने उडवले

CSMT : लाल बॅगेचं गूढ उलगडलं! कोणताही धोका नाही, बॅगेत आढळल्या 'या' वस्तू