मुंबई : राज्यातील शाळांच्या कामकाजात एकसूत्रता आणण्यासाठी मोबाइल ॲपच्या माध्यमातून जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे राज्यातील शाळांची माहिती एका क्लिकवर मिळणार असून जिओ टॅगिंगच्या माध्यमातून शाळांवर वॉच असणार आहे.
राज्यातील ग्रामीण, शहरी भागातील प्राथमिक शिक्षणाचे संस्कार केंद्र असणाऱ्या अंगणवाडी, विविध माध्यमांच्या शाळांच्या कामकाजात एकसूत्रीपणा आणण्यासाठी मोबाईल ॲपच्या माध्यमातून जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रांना छायाचित्रांसह संबंधित माहिती येत्या ३० एप्रिलपर्यंत ॲपवर नोंदवणे बंधनकारक केले आहे. शिवाय संबंधित शाळांनी भरलेल्या माहितीची खातरजमा करण्याची जबाबदारी शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
राज्यातील सर्व शाळांबाबतची संपूर्ण माहिती केंद्र शासनाच्या यूडीस प्लस या पोर्टलवर उपलब्ध केली आहे. विद्यार्थी संख्या, शिक्षक संख्या, शाळांमध्ये उपलब्ध भौतिक सुविधा, संगणकीय सुविधा इ. शाळांबाबतच्या विविध माहितीचा यात समावेश आहे. शासनस्तरावर विविध धोरण, कार्यक्रमांची आखणी तसेच अंमलबजावणीचा आराखडा तयार करताना या माहितीचा वापर केला जातो. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर या संस्थेसोबत करार करून माहिती गोळा करण्याचे काम देण्यात आले आहे.
शिक्षण विभागाच्या माहितीचे एकत्रीकरण
विविध विभागांची माहिती, यूडीस प्लस या पोर्टलवरील शालेय शिक्षण विभागांच्या माहितीचे एकत्रीकरण केले जाईल. स्वतंत्र डॅशबोर्ड यासाठी तयार केले जाईल. तसेच महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर या संस्थेतर्फे शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रासह टॅग करण्यात येईल. गोळा केलेली माहिती मोबाईल ॲप महास्कूल जीआयएसवरून उपलब्ध होणार आहे.