मुंबई : टीईटी सक्ती आणि संच मान्यतेच्या जीआरविरोधात राज्यातील सर्व संघटनांनी ५ डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला विविध संघटनांकडून पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे. शिक्षक भारती संघटनेने आणि मुंबई मराठी अध्यापक संघांनेही आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
टीईटी सक्तीमुळे शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ५३ पेक्षा कमी वय असणाऱ्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सक्ती केली आहे. शिक्षक संघटनासोबत नागपूर येथे पार पडलेल्या बैठकीत शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याबाबत कोणतेही परिपत्रक शिक्षण विभागाने काढलेले नाही.
शैक्षणिक वर्षाच्या मध्यावधीत संचमान्यतेचे अन्यायकारक निकष लावून हजारो शिक्षकांना अतिरिक्त ठरवले जात आहे. विषयाला शिक्षक उरणार नाही. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्याने शाळांचे संपूर्ण नियोजन कोलमडणार आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी सर्व संघटनांनी केलेली आहे.
शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी शिक्षक भारतीच्या सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्यांनी मोठ्या संख्येने ५ डिसेंबरच्या शाळा बंद आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. तर राज्यातील २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये. १५ मार्च २०२४ रोजीचा संच मान्यता शासन निर्णय रद्द करून जुन्या निकषाप्रमाणे संच मान्यता करण्यात यावी. यासह शिक्षकांच्या अन्य मागण्यांसाठीच्या सर्व संघटनाच्या शाळा बंद आंदोलनाला मुंबई मराठी अध्यापक संघांचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी जाहीर पाठिंबा दिला असून शेकडो शिक्षक या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
...तर हिवाळी अधिवेशनादरम्यान धरणे आंदोलन करू!
शिक्षण विभागाने टीईटी सक्ती व अन्यायकारक संच मान्यतेचा जीआर रद्द करण्याबाबत ठोस निर्णय घेऊन संघटनांना चर्चेसाठी न बोलावल्यास नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात १० डिसेंबरला शिक्षक भारती संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आहे, अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी दिली आहे.