मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. ९ जागांसाठी नियमित निवडणूक आणि एका जागेसाठी पोटनिवडणूक अशी एकूण १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने यासाठी संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला असून त्याच दिवशी संध्याकाळी निकालही घोषित केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
राजीव सातव यांची जागा काँग्रेसला द्या!
सपकाळ यांनी पुढे बोलताना राजीव सातव यांच्या जागेचा मुद्दाही उपस्थित केला. ही जागा काँग्रेसची असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी राजकीय संस्कृतीबद्दल केलेल्या विधानाची आठवण करून देत, आता तीच संस्कृती दाखवत ही जागा काँग्रेसला देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीतील गणित पाहता सत्ताधारी महायुती मजबूत स्थितीत असल्याचे दिसते. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपकडे १३१, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ५७ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे ४० आमदार आहेत. त्यामुळे महायुतीचे किमान ८ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. दुसरीकडे महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ सुमारे ४६ असल्याने त्यांचा केवळ एक उमेदवार निश्चित विजयी होण्याची शक्यता आहे.
संपूर्ण प्रक्रिया १३ मेपर्यंत पूर्ण
निवडणुकीचा कार्यक्रमही स्पष्ट करण्यात आला आहे. २३ एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार असून ३० एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असेल. २ मे रोजी अर्जांची छाननी होईल, तर ४ मेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. १२ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होणार आहे. संपूर्ण प्रक्रिया १३ मेपर्यंत पूर्ण केली जाणार असून या निवडणुकीतून राज्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
आघाडीचा एकच उमेदवार होईल विजयी
विधान परिषद निवडणुकीत एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी २९ मतांचा कोटा आवश्यक असतो. त्यामुळे दुसऱ्या जागेसाठी महाविकास आघाडीला अतिरिक्त १० मतांची गरज भासणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत ही मतांची जुळवाजुळव करणे कठीण मानले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे असतील तरच काँग्रेसचा पाठिंबा
याच दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महत्त्वाचे वक्तव्य करत राजकीय चर्चांना उधाण आणले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाण्याचा निर्णय घेत असतील तर काँग्रेस त्यांना पाठिंबा देण्यास तयार आहे. मात्र, इतर कोणत्याही प्रस्तावावर चर्चा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे आघाडीतील जागावाटपावरून मतभेद उघड होण्याची चिन्हे दिसत आहेत.