Maharashtra Weather : राज्यात हवामान बदलाची चिन्हे; कडाक्याच्या उन्हानंतर 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा 
महाराष्ट्र

Maharashtra Weather : राज्यात हवामान बदलाची चिन्हे; कडाक्याच्या उन्हानंतर 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा

राज्यात तापमान ४१ अंशांपर्यंत पोहोचल्याने उष्णतेचा कडाका वाढला आहे. मात्र हवामान खात्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला असून हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Mayuri Gawade

राज्यात सध्या उन्हाचा कडाका वाढत असतानाच हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. काही भागात तापमान चाळीशीच्या पुढे गेले असताना दुसरीकडे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

मार्चमध्येच तापमान चाळीशीपार

यंदा फेब्रुवारीच्या मध्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढू लागला होता. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच अनेक भागांत तापमानाने चाळीशी गाठली आहे. विदर्भातील अकोला येथे बुधवारी राज्यातील सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

अवकाळी पावसाची शक्यता

दरम्यान, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हवामानात बदल होत असून काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत राज्यातील काही भागांत अधूनमधून पाऊस झाला होता. आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे.

या जिल्ह्यांना पावसाचा इशारा

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शुक्रवार आणि शनिवार (१३ व १४ मार्च) या दोन दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. १३ मार्च रोजी यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. तर १४ मार्च रोजी नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठीही 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.

याशिवाय पुणे, नांदेड, बीड आणि परभणी जिल्ह्यांमध्येही अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून जोरदार वारेही वाहू शकतात.

हवामान खात्याचा अंदाज

भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यातील हवामानात चढउतार सुरूच राहतील. काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून विदर्भात उष्णतेचा कडाका अधिक जाणवत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे.

दरम्यान, मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यासाठी उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून काही भागांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Thane : ना आरोपपत्र, ना पीडितांना भरपाई; मुंब्रा रेल्वे अपघाताचे एक वर्ष, जखमी प्रवाशांनी गमावली नोकरी, झाले कर्जबाजारी

मुंबईच्या महापौर रितू तावडेंना बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल; सुरक्षा यंत्रणा सतर्क, पोलिसांचा तपास सुरू

Mumbai : पावसाळ्यात मेट्रो सज्ज; MMRDA ची एआय-आधारित पेन्टाेग्राफ मॉनिटरिंग यंत्रणा कार्यान्वित

Jammu-Kashmir : ‘झोजिला’चा मार्ग मोकळा; गडकरी यांच्या हस्ते अंतिम ‘ब्रेकथ्रू’ साध्य

मुंबई एअरपोर्टवर CISF महिला जवानांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ; CPR देत वाचवला प्रवासी महिलेचा जीव, Video