मुंबई : महायुतीत जागावाटपाचा कुठलाही वाद नसून स्थानिक पातळीवर याबाबत निर्णय घेतला जातो. जागावाटपाच्या प्रक्रियेला वेग आला असून पुढील दोन दिवसांत जागावाटपाचे चित्र स्पष्ट होईल, असे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून १७ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वी महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून मुंबई महानगरपालिकेत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय मविआतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे मविआत फूट पडल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर महायुतीतही काही फारसे आलबेल नसल्याची चर्चा सुरू होती. मात्र, जागावाटपावरून महायुतीत कुठलाही वाद नसल्याचे फडणवीस यांनी रविवारी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
नगर परिषद, नगरपंचायत निवडणुका काही मोठ्या निवडणुका नाहीत. मात्र, महानगरपालिकेत जमेल तेथे युती करण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले.
...म्हणून ते बिहारला गेले नाहीत
अजित पवार यांना बिहार निवडणूक लढवायची नव्हती. त्यामुळे ते बिहारमध्ये गेले नाहीत, असे फडणवीस एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.