आंबा, काजू नुकसान; मदत वाढवण्याचे निर्देश, मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घातल्याची नितेश राणे यांची माहिती 
महाराष्ट्र

आंबा, काजू नुकसान; मदत वाढवण्याचे निर्देश, मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घातल्याची नितेश राणे यांची माहिती

आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली मदत वाढवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखात्याला दिले आहेत.

Swapnil S

मुंबई : आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली मदत वाढवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखात्याला दिले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

मत्स्य व बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत माहिती दिली. येत्या काही दिवसांत महायुती सरकार आंबा व काजू उत्पादकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील आणि ही भूमिका कृतीतून दिसून येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री उदय सामंत आणि नितेश राणे यांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अत्यंत अपुरी असल्याचा मुद्दा उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवत त्यांनी मदत वाढवण्याची जोरदार मागणी केली.

बैठकीदरम्यान मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, सध्या जाहीर केलेल्या मदतीनुसार प्रत्येक झाडामागे केवळ २२० रुपये दिले जात आहेत, ही रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे. आंबा व काजू उत्पादक शेतकरी सहसा मदत मागत नाहीत, मात्र सध्याच्या परिस्थितीत राज्य सरकारने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ अर्थखात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना मदत वाढवण्याबाबत निर्देश दिले. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांसाठी अधिक दिलासा देणारा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कोकणातील आंबा व काजू उत्पादकांचे यंदा खूप मोठे नुकसान झाले आहे. आधी आलेला मोहोर झडून गेला तसेच आता आंब्याची गळही मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम हातातून गेल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. या संदर्भात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी अलिकडेच कोकणात मोर्चाही काढला होता.

Mumbai Rain : पुढील ४८ तास मुंबईसह उपनगरांसाठी रेड अलर्ट; IMD कडून अतिमुसळधार पावसाचा इशारा

Thane : पाण्यात उतरलेल्या करंटमुळे १७ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू; कुटुंबीयांकडून निष्काळजीपणाचा आरोप

Mumbai : धरण क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठा ८ टक्के पार, कपातीबाबत पालिकेची ‘थांबा व वाट पाहा’ भूमिका

कर्ज बाजारपेठ दुप्पट; भारतातील बँकांचे कर्ज वितरण पाच वर्षात पोहोचले २५ अब्ज डॉलरवर

Navi Mumbai : ‘त्या’ दोन अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन; महिलेच्या मृत्यूप्रकरणी आयुक्तांची कारवाई