मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांनी राज्याचा दौरा करत सभा घेण्याचा धडाडा लावला आहे. मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमकी घडत आहेत. असं असताना मनोज जरांगे-पाटील यांनी पुण्याच्या खराडी इथल्या सभेत केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. यामुळे जरांगे यांना मोठ्या टिकेला समोरं जावं लागलं होतं. "लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागतंय", असं आक्षेपार्ह विधान मनोज जरांगे यांनी केलं होतं. पण आता हे विधान अंगलट आल्याने लायकी हा शब्द आपण मागे घेतो असं जरांगे यांनी जाहीर केलं आहे.
काय म्हणाले जरांगे-पाटील?
जरांगे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. माझा म्हणायचा उद्धेश तसा नव्हता, वेगळा होता. पण विनाकारण त्याला जातीकडं ओढण्याचा प्रयत्न करायला लागले. काहींनी त्या शब्दाचा विनाकारण गैरसमज केला तर काहींनी राजकीय स्वार्थापोटी त्या शब्दाचा अर्थ वेगळा जोडून त्याला जातीय रंग देण्याकडं ओढलं.
ते पुढे म्हणाले की, माझा म्हणणाच्या उद्देश तसा नव्हता,कारण मी कधीही जातीयवाद करत नाही आणि कधीही केलेला नाही. माझा म्हणण्याचा उद्देश वेगळा होता, पण विनाकारण काहीजण त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करायला लागले. परंतु आमचं मराठा आरक्षणापासून ध्येय हटणार नाही. तरीही काहीजणांचा जर गैरसमज होऊ नये म्हणून मी तो शब्द मागे घेतो, असं मनोज जरांगे म्हणाले.