छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या अपूर्ण मागण्यांवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारविरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. जरांगे यांनी आगामी ३० मेपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा शनिवारी केली असून, मराठवाड्यात कुणबी जातीची प्रमाणपत्रे वाटप करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला २९ मेपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात पत्रकारांशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करण्याची जोरदार मागणी केली. या समितीने समाजासाठी काहीही केले नसल्याचा आरोप करत त्यांनी मराठा आणि कुणबी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्याची मागणीही लावून धरली.
या संपूर्ण प्रकरणावर उपसमितीचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, आपल्या राजीनाम्याने जर आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल आणि आंदोलकांचे समाधान होणार असेल, तर आपल्याला या पदाला चिकटून राहण्यात रस नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जरांगे यांनी राज्य सरकारवर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबवल्याचा गंभीर आरोप केला आहे.