जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी (दि. १२) मोठी घोषणा केली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आता मुंबईच्या दिशेने मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मुंबईकडे जाण्याचा मार्गही निश्चित करण्यात आला आहे. अंतरवाली सराटी येथे झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर जरांगे यांनी ही माहिती दिली. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या मोर्चाचा मार्ग, मुक्कामाची ठिकाणे आणि आझाद मैदानापर्यंत पोहोचण्याबाबत अंतरवाली सराटीत झालेल्या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर जरांगे यांनी मराठा बांधवांना मोठ्या संख्येने मुंबईत सहभागी होण्याचे आवाहन केले.
मराठा मोर्चाचा पाच दिवसांचा आराखडा
जरांगे यांच्या माहितीनुसार, अंतरवाली सराटी ते मुंबई असा पाच दिवसांचा मोर्चाचा आराखडा निश्चित करण्यात आला असून, १५ सप्टेंबरपासून सुरू होणारा हा मोर्चा १९ सप्टेंबरला मुंबईत पोहोचणार आहे.
१५ सप्टेंबर : अंतरवाली सराटीतून महामोर्चाला सुरुवात, पहिला मुक्काम पाटोदा, बीड
१६ सप्टेंबर : मोर्चाचा प्रवास पुढे सुरू राहणार, दुसरा मुक्काम श्रीगोंदा, अहिल्यानगर
१७ सप्टेंबर : तिसरा मुक्काम हडपसर, पुणे
१८ सप्टेंबर : चौथा मुक्काम खोपोली, रायगड
१९ सप्टेंबर : मोर्चा मुंबईत दाखल होणार. सकाळी १० वाजता आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात होणार.
उपोषणातून अद्याप मार्ग निघालेला नसल्याने मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतल्याचे जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबईत पोहोचल्यानंतर आझाद मैदानावर आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
'मुंबईत जायचं आणि जिंकून यायचं'
मराठा समाजाला मोठ्या संख्येने मुंबईत येण्याचे आवाहन करताना जरांगे म्हणाले, "समाजासाठी ही लढाई आहे. कुणाला खुन्नस द्यायची नाही. आपल्याला मुंबईत जायचं आणि जिंकून यायचं आहे."
"माझा समाज बलशाली आहे. समाजाच्या प्रतिष्ठेसाठी गर्दी होते. इथून गाड्या घेऊन निघालो तर दोन-तीन दिवस लागतील," असेही जरांगे यांनी सांगितले.
मुंबईला येणाऱ्या मराठा बांधवांनी तसेच मार्गातील मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या समाजबांधवांनी तयारीला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. मुंबईला येणे शक्य नसलेल्या बांधवांनी आंदोलनाच्या मार्गावर येऊन आशीर्वाद द्यावा, असेही त्यांनी म्हटले.
उच्च न्यायालयाकडून मोर्चाला स्थगिती नाही
दरम्यान, जरांगे यांच्या प्रस्तावित मुंबई मोर्चाला किंवा आंदोलनाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. केवळ कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, या आधारावर आंदोलनाला बंदी घालता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
मुख्य न्यायमूर्ती एम. सी. त्रिपाठी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. लोकशाही व्यवस्थेत आंदोलन करणे हा कायदेशीर अधिकार असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास राज्य सरकार त्यावर कारवाई करण्यास सक्षम आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
जरांगेंना वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश
अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांना आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची खात्री करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. सरकारने जरांगे यांच्याशी संवाद साधावा, असेही न्यायालयाने म्हटले.
दरम्यान, मुंबईत आंदोलन किंवा मोर्चासाठी जरांगे यांच्याकडून अद्याप परवानगीचा अर्ज आलेला नसल्याची माहिती राज्याचे ॲडव्होकेट जनरल मिलिंद साठे यांनी न्यायालयाला दिली.
आरक्षणाच्या मागण्यांवर ठाम
सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जरांगे उपोषण करत आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, हैदराबाद आणि सातारा गॅझेटमधील नोंदी लागू करून पात्र मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्रे द्यावीत, या मागण्यांवर आपण ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
उपोषणातून अद्याप मार्ग निघालेला नसल्याने मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता १५ सप्टेंबरला अंतरवाली सराटीतून निघणारा महामोर्चा १९ सप्टेंबरला मुंबईत दाखल होणार असल्याने पुढील काही दिवसांत मराठा आंदोलकांच्या हालचालींकडे प्रशासनाचेही लक्ष लागले आहे.