अलिबाग : अलिबाग तालुक्यातील पेझारी आणि आंबेपूर गावांमध्ये एमआयडीसीच्या पाईपलाइनमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी भाजपचे नेते, माजी आमदार पंडित पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील यांनी बुधवारी एमआयडीसीच्या नागडोंगरी कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली.
या बैठकीत पेझारी नाक्यावर मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्याची समस्या, अपूर्ण असलेली पेझारी–शहापूर आणि पेझारी नाका–चरी रस्त्यांची कामे, तसेच शेतीत घुसणारे बॅक वॉटर हे मुद्दे चर्चेला आले. यावर अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याचे पंडित पाटील यांनी सांगितले.
एमआयडीसीच्या फिल्टर प्लांटमधून निघणारा कचरा आणि नाल्यांच्या तुंबल्यामुळे शेतात पाणी साचत असल्याने नाला साफ करण्याची मागणीही करण्यात आली. शिवाय, पेझारी आणि आंबेपूर ही गावे एमआयडीसी क्षेत्रात येत असल्याने त्यांना सीएसआर अंतर्गत आवश्यक सुविधा मिळाव्यात, अशी मागणीही नेत्यांनी केली आहे. या वेळी मोठ्या संख्येने स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.