मुंबई : राज्य सरकारने शैक्षणिक धोरणांतर्गत पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) याबाबत थेट नाराजी व्यक्त केली आहे. आता मनसेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून ‘हिंदी भाषा अनिवार्य करण्याची सक्ती नकोच’, असे साकडे घातले आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या पत्रात म्हटले आहे की, “ज्या पद्धतीने सरकार हिंदी भाषेची सक्ती करून हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम करत आहे. त्यामुळे हिंदू समाज हा एकत्र येण्याऐवजी विखुरण्याचीच शक्यता अधिक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक वैचारिक अधिष्ठान आहे आणि ही संघटना विचारांच्या आधारावर उभी आहे. म्हणूनच हे सांगण्याचे धाडस करत आहोत. हिंदू धर्मामध्ये फूट पाडण्याच्या या कृतीला आपण चाप बसवाल हा आमचा ठाम विश्वास आहे.”
“सध्या शालेय शिक्षणात हिंदी भाषेची सक्ती करण्यात येत आहे. मराठी माणूस हा सहिष्णू आहे, त्याचा गैरफायदा घेण्यात येत आहे. मराठी माणूस हासुद्धा हिंदूच आहे. गुजराती, तामिळ बोलणारा हासुद्धा हिंदूच आहे. ‘पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड उत्कल बंग’ हे आपल्या देशाच्या राष्ट्रगीतात आहे. विविधतेत एकता हे नुसत्या देशाचे वैशिष्ट्य नाही तर आपल्या हिंदू धर्माचेसुद्धा वैशिष्ट्य आहे. ख्रिस्ती धर्म वाढवण्यासाठी तामिळ, मल्याळम, कोंकणी ही बोली भाषा आत्मसात करण्यात आली. हे सर्व सांगण्याचे कारण एकच आहे की, धर्म वाढवायचा असेल, टिकवायचा असेल तर सर्व भाषांना सामावून घेणे गरजेचे आहे. एका समूहाची भाषा दुसऱ्या समूहावर लादून धर्म वाढू शकत नाही. पाकिस्तानातील बंगाली बोलणाऱ्या मुसलमानांनी भाषेआधारीत स्वतंत्र राष्ट्र घेतले हा इतिहास ताजा आहे,” असेही देशपांडे यांनी मोहन भागवत यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
मराठ्यांनी भारतावर राज्य केले, पण कधी मराठीची सक्ती केली नाही
“मराठ्यांनी जवळपास २०० वर्षे बहुतांश भारतावर राज्य केले. मात्र, मराठ्यांनी कधीच मराठी भाषा त्या प्रांतांवर लादली नाही. इंग्रजांनी मोगलांकडून नव्हे तर मराठ्यांकडून हिंदुस्थान जिंकला. शिंदे ग्वाल्हेरमध्ये, गायकवाड बडोद्यामध्ये, दक्षिणेत तंजावर येथे मराठ्यांचे राज्य होते. गुगल नसतानासुद्धा त्यावेळी मराठ्यांना मराठी ही संपर्काची भाषा करावीशी वाटली नाही. उलटपक्षी शिंदे हे ग्वाल्हेर येथे जाऊन सिंधिया झाले,” असेही या पत्रात म्हटले आहे.