मुंबई : एकीकडे भीषण उन्हाळा असताना मोसमी पाऊसही दरवाजा ठोठावू लागला आहे. कोकण व मुंबईत गेल्या दोन दिवसांत हलक्या ते मध्यम सरी पडल्या आहेत. सिंधुदुर्गात कणकवली, देवगड, मालवण भागात ७० ते १०० मिलीमीटरपर्यंत पाऊस झाला. घाटमाथ्यावरही कोल्हापूर, सातारा, पुणे वगैरे भागात काही ठिकाणी पाऊस झाला आहे. दरम्यान मुंबई आणि ठाण्यातील काही भागांत रविवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या.
मुंबईत दहिसर, बोरिवली ते अंधेरी, दादर इत्यादी भागात अगदीच शिंतडल्यासारखा पाऊस झाला. मात्र ठाण्यातील सरींनी रस्त्यांवर पाणी साठले. या पावसाने हवेतील आर्द्रता तसेच उष्मा आणखीनच वाढला व दिवसभर प्रचंड उकाडा सहन करावा लागला.
सांताक्रूझ वेधशाळेत किमान तापमान २९.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून तिथे पावसाची नोंद झालेली नाही. दुसरीकडे, दक्षिण मुंबईतील कुलाबा हवामान केंद्रात किमान तापमान २८.६ अंश सेल्सिअस आणि ०.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.