पुणे : कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि सोलापूरपर्यंत सोमवारी धडक दिल्यानंतर, राज्यातील मान्सूनची प्रगती मंगळवारी स्थिर होती. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून राज्याच्या आणखी काही भागांमध्ये सक्रिय होऊन पुढे सरकण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकणात मान्सूनचे आगमन झाले असून दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरच्या काही भागांतही पावसाने हजेरी लावली आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रात आज पावसाच्या सरी
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागेल. विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही वादळी पावसाचा इशारा कायम आहे.
बुधवारी देखील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाच्या सरी हजेरी लावतील, ज्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, ज्या भागात अद्याप पाऊस सक्रिय झालेला नाही, तिथे कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका कायम राहील, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.