रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका भरधाव कारने लांजाजवळ पुढे जाणाऱ्या डंपरला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत कारचा अक्षरशः चुराडा झाला असून एकाच कुटुंबातील दोन महिला आणि एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. मुंबई आग्रीपाडा येथे राहणारे हे कुटुंब गोव्यातून मुंबईला परतत असताना हा अपघात घडला. या अपघातामध्ये अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे.प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कुटुंब गोव्यातील प्रवास आटोपून मुंबईच्या दिशेने निघाले होते. लांजा शहराजवळ आल्यानंतर पुढे जात असलेल्या डंपरला त्यांच्या भरधाव कारची मागून जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा पूर्ण चुराडा झाला आणि वाहनातील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मृतांची ओळख अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नसून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.