नांदेड जिल्ह्यातील लेंढी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने मुखेड तालुक्यात हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत ८ जणांचा बळी गेला असून शेकडो घरे जलमय झाली आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक गावांना पुराचा वेढा बसला असताना मुखेडचे भाजप आमदार तुषार राठोड तब्बल २४ तासांनी गावात दाखल झाल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे.
३०० हून अधिक जणांची सुटका
पुरामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत ३०० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. काही ठिकाणी नागरिक पाण्यात अडकले असल्याने नौका आणि लष्कराच्या मदतीने बचावकार्य करावे लागले. एका रात्रीत घरात पाणी शिरून अनेकांचे संसार उध्वस्त झाले.
आमदार नेमके कुठे होते?
ग्रामस्थांनी रोष व्यक्त करत आमदारांना जाब विचारला. "इतकी भीषण आपत्ती ओढावली असताना आमदार नेमके कुठे होते?" असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला. पाहणीसाठी उशिरा आल्याबद्दल लोकांनी जोरदार नाराजी व्यक्त केली.
प्रशासनाची चौकशी
नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले की, "लेंढी प्रकल्प परिसरात ३० टक्के पाणीसाठा असूनही इतक्या मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती का निर्माण झाली, याची चौकशी सिंचन खात्याकडून करण्यात येणार आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल."