नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील भारसवाडा गावात ही हृदयस्पर्शी घटना घडली आहे. माहितीनुसार, संतोष धनुरे या २४ वर्षीय तरुणाचा सात महिन्यांपूर्वी शीतलसोबत विवाह झाला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात संतोष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या वेळी शीतल तीन महिन्यांची गर्भवती होती. या घटनेनंतर तिच्या पुढील आयुष्याचा प्रश्न निर्माण झाला.
कठीण प्रसंगी गावकऱ्यांचा पुढाकार
या परिस्थितीत गावातील सरपंच आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेत शीतलच्या भविष्याचा विचार केला. तिच्या पोटातील बाळाला आधार आणि वडिलांचं नाव मिळावं, यासाठी संतोषचा लहान भाऊ राजेश्वर धनुरे याच्यासोबत तिचा विवाह लावून देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
सुरुवातीला ‘समाज काय म्हणेल?’ या भीतीमुळे कुटुंबीय साशंक होते. मात्र, गावकऱ्यांनी समजूत काढत दोन्ही कुटुंबांना या निर्णयासाठी तयार केलं.
साध्या पद्धतीने विवाह, मोठी जबाबदारी स्वीकारली
यानंतर दोन दिवसांपूर्वी राजेश्वर आणि शीतल यांचा विवाह साध्या पद्धतीने पार पडला. राजेश्वरने केवळ वहिनीचा हात धरला नाही, तर तिच्या पोटातील बाळाची जबाबदारीही स्वीकारली.
विशेष म्हणजे, दोन्ही कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने संपूर्ण गावानेच लग्नाचा खर्च उचलला. गावकऱ्यांनी एकत्र येत विवाहसोहळा पार पाडला आणि गावजेवणाचीही व्यवस्था केली.
माणुसकीचा आदर्श; सर्वत्र कौतुक
भारसवाडा गावाने दाखवलेली ही संवेदनशीलता आणि माणुसकी समाजातील अनिष्ट प्रथांना छेद देणारी ठरत आहे. या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत असून, गावाने एक वेगळाच आदर्श समाजासमोर ठेवला आहे.