Nanded : भावाच्या मृत्यूनंतर गर्भवती वहिनीशी दीराने केलं लग्न; गावकऱ्यांनी उचलला लग्नाचा खर्च 
महाराष्ट्र

Nanded : भावाच्या मृत्यूनंतर गर्भवती वहिनीशी दीराने केलं लग्न; गावकऱ्यांनी उचलला लग्नाचा खर्च

नांदेडमधील भारसवाडा गावात भावाच्या मृत्यूनंतर गरोदर वहिनीशी दीराने विवाह केल्याची हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. गावकऱ्यांनी पुढाकार घेत हा निर्णय घडवून आणला असून संपूर्ण गावाने लग्नाचा खर्च उचलत माणुसकीचा आदर्श दाखवला.

Mayuri Gawade

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील भारसवाडा गावात ही हृदयस्पर्शी घटना घडली आहे. माहितीनुसार, संतोष धनुरे या २४ वर्षीय तरुणाचा सात महिन्यांपूर्वी शीतलसोबत विवाह झाला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात संतोष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या वेळी शीतल तीन महिन्यांची गर्भवती होती. या घटनेनंतर तिच्या पुढील आयुष्याचा प्रश्न निर्माण झाला.

कठीण प्रसंगी गावकऱ्यांचा पुढाकार

या परिस्थितीत गावातील सरपंच आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेत शीतलच्या भविष्याचा विचार केला. तिच्या पोटातील बाळाला आधार आणि वडिलांचं नाव मिळावं, यासाठी संतोषचा लहान भाऊ राजेश्वर धनुरे याच्यासोबत तिचा विवाह लावून देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

सुरुवातीला ‘समाज काय म्हणेल?’ या भीतीमुळे कुटुंबीय साशंक होते. मात्र, गावकऱ्यांनी समजूत काढत दोन्ही कुटुंबांना या निर्णयासाठी तयार केलं.

साध्या पद्धतीने विवाह, मोठी जबाबदारी स्वीकारली

यानंतर दोन दिवसांपूर्वी राजेश्वर आणि शीतल यांचा विवाह साध्या पद्धतीने पार पडला. राजेश्वरने केवळ वहिनीचा हात धरला नाही, तर तिच्या पोटातील बाळाची जबाबदारीही स्वीकारली.

विशेष म्हणजे, दोन्ही कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने संपूर्ण गावानेच लग्नाचा खर्च उचलला. गावकऱ्यांनी एकत्र येत विवाहसोहळा पार पाडला आणि गावजेवणाचीही व्यवस्था केली.

माणुसकीचा आदर्श; सर्वत्र कौतुक

भारसवाडा गावाने दाखवलेली ही संवेदनशीलता आणि माणुसकी समाजातील अनिष्ट प्रथांना छेद देणारी ठरत आहे. या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत असून, गावाने एक वेगळाच आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

मॅरेथॉनमुळे ठाण्यात वाहतूक बदल; प्रमुख मार्गांवर प्रवेशबंदी, अनेक ठिकाणी 'नो पार्किंग'

पॅकबंद अन्नावर आता षटकोनी लाल इशारा

कशेडी घाटाच्या बोगद्यात गळती सुरूच; उपाययोजना कागदावरच, गणेशभक्तांवर चिंतेचे सावट

एव्हरेस्ट, लालजीच्या हिंग पावडरवर बंदी

मुरली मनोहर जोशी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; सरकार स्वतःच घोटाळ्यांमध्ये अडकल्याची टीका