मुंबई : महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, कल्याणसह एकूण १३ जागांसाठी पाचव्या टप्प्यात मतदान २० मे होणार आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथे पार पडली. या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली.
काँग्रेसमुळं देशाची पाच दशके वाया गेली...
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "एक अशी वेळ होती, जेव्हा देशाचे पंतप्रधान देशवासीयांना आळसी म्हणून संबोधत होते. स्वातंत्र्यानंतर गांधीजींच्या सल्लानुसार काँग्रेस भंग केलं असतं. तर भारत कमीत कमी पाच दशके पुढे असता. देशातील व्यवस्थेचं काँग्रेसीकरण झाल्यामुळं देशाची पाच दशके वाया गेली"
पंतप्रधानांनी दिली विकसित भारताची गॅरंटी-
मोदी पुढं म्हणाले की, "स्वातंत्र्यावेळी देश सहावी अर्थव्यवस्था होता, पण २०१४ला जेव्हा काँग्रेस सत्तेवरून गेली तेव्हा ही अर्थव्यवस्था अकराव्या नंबरवर गेली. परंतु तुम्ही जेव्हा आम्हाला संधी दिली तेव्हा देश पाचव्या नंबरची आर्थिक ताकद बनला आहे. आज भारतात, मुंबईत विक्रमी गुंतवणूक येत आहे. आणि माझी गॅरंटी आहे काही काळानं मी जेव्हा तुमच्या समोर येईन, तेव्हा आपण जगातील तिसरी आर्थिक ताकद असणार. मी तुम्हाला विकसित भारत देणार आहे. त्यासाठी मोदींचा प्रत्येक क्षण देशाच्यासाठी आहे."
त्यांना राम मंदिरही अशक्य वाटत होतं...
"जगाला कधीना कधी हे मान्य करावं लागेल, की भारतभूमीवरील लोक इतके पक्के होते की, आपल्या एका स्वप्नासाठी पाचशे वर्ष लढत राहिले. अनेक पिढ्यांच त्याग आणि पाचशे वर्षांचं स्वप्न...आज रामलल्ला विराजमान झाले." असं मोदी म्हणाले.
देशाच्या संसदेनं तीन तलाकला तलाक, तलाक,तलाक म्हटलं. महिलांना ३३ टक्के आरक्षणासाठी ४० वर्ष वाट पाहावी लागली.