कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरणार 
महाराष्ट्र

कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरणार; १० ऑक्टोबर रोजी नाशिक-संभाजीनगर रास्ता रोको

उन्हाळी कांद्याला गेल्या आठवड्यात सरासरी १,२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असताना, सोमवारपासून त्यात १०० ते १२५ रुपयांची घसरण झाली आहे. सध्या सरासरी दर १,०७५ रुपये प्रति क्विंटल इतका आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

Swapnil S

लासलगाव : उन्हाळी कांद्याला गेल्या आठवड्यात सरासरी १,२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असताना, सोमवारपासून त्यात १०० ते १२५ रुपयांची घसरण झाली आहे. सध्या सरासरी दर १,०७५ रुपये प्रति क्विंटल इतका आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवार, दि. १० ऑक्टोबर रोजी नाशिक-संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे यांनी दिली. कांद्याला समाधानकारक दर मिळेल, अशी अपेक्षा धरून शेतकऱ्यांनी मार्च-एप्रिलपासून साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा पाच-सहा महिन्यांनंतरही बाजारात उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने विक्रीसाठी आला आहे. विशेषतः रांगडे कांद्याला फक्त १५०-२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे.

या वर्षी परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे बंपर उत्पादन झालेले कांद्याचे पिक खराब झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवला होता, त्याचा देखील खराब होण्याची भीती आहे. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव सरासरी १,२०० ते उच्चतम १,५०० रुपये प्रति क्विंटल होते, ते आता १,१०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत, जे उत्पादन खर्चापेक्षा कमी आहेत.

एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीत निर्यात धोरणांमुळे ४,६९,००० मेट्रिक टन कांदा निर्यात झाला असून १,०३८ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले. मात्र, अमेरिकन व युरोपियन देशांमध्ये निर्यात अत्यल्प आहे. यासाठी निर्यातीयोग्य पांढऱ्या व गोड चवीच्या कांद्याची लागवड करणे आणि त्यासाठी लागणारे बीज शेतकऱ्यांना मोफत पुरवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

भारतातून अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये कांद्याची निर्यात अत्यल्प होत असून येथील निर्यातीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यासाठी निर्यातीयोग्य पांढऱ्या व गोड चवीच्या कांद्याची लागवड करावी आणि त्यासाठी लागणारे बीज शेतकऱ्यांना मोफत पुरवावे. यामुळे शेतकरी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कांदा उत्पादन करू शकतील आणि भविष्यात निर्यात वाढवून देशाच्या परकीय चलनात भर पडेल. शासनाने या संदर्भातसकारात्मक निर्णय घ्यावा.
सुवर्णा जगताप, संचालक लासलगाव बाजार समिती
सध्या निर्यात केलेल्या उत्पादनांवरील शुल्क आणि करांमध्ये सूट दर केवळ १.९% इतका आहे. मात्र सरकारने हा दर ५% पर्यंत वाढविल्यास भारतीय कांदा निर्यातदारांना जागतिक बाजारपेठेत अधिक सक्षमतेने स्पर्धा करता येईल.
विकास सिंह,उपाध्यक्ष

दिवाळीत ‘धमाका’ नव्हे, शिस्त! पुणे पोलिसांची फटाक्यांवर कडक नियमावली; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

Mumbai Metro 3 : फक्त Hi करा, तिकीट मिळवा! WhatsApp द्वारे एका क्लिकमध्ये बुक करा तिकीट, जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप पद्धत

Mumbai Metro 3 : ना नेटवर्क, ना फोन कॉल; UPI पेमेंटमध्येही अडचणी, पहिल्याच दिवशी मुंबईकर त्रस्त

आजपासून Mumbai One ॲप सुरू, पण iPhone वापरकर्त्यांना नाही सापडत! जाणून घ्या डाउनलोडचा पर्याय आणि फीचर्स

IPS पूरन कुमार आत्महत्या प्रकरण : ९ पानी चिठ्ठी, १५ अधिकाऱ्यांवर छळाचे आरोप; अखेर 'हे' धक्कादायक कारण समोर