मुंबई : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे अडकलेल्या पर्यटकांना राज्यात परत आणण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या दोन दिवसांत आतापर्यंत सुमारे ५०० पर्यटक राज्यात परतले आहेत. राज्य सरकारने इंडिगो आणि एअर इंडिया अशी दोन विशेष विमाने पर्यटकांसाठी पाठवली होती. त्यातून १८४ पर्यटक गुरूवारी मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, आणखी २३२ प्रवाशांसाठी शुक्रवारी एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकार करीत आहे. या विशेष विमानात अकोला, अमरावती येथील पर्यटक असणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने काश्मीरला जाण्यास सांगितले होते. गिरीश महाजन यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी एकूणच स्थितीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही काश्मीरमध्ये दाखल झाले असून तेही या मदतकार्यात सहभागी झाले आहेत.
त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित
काश्मीरातील महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदनातील कक्ष अशी त्रिस्तरिय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या विनंतीवर काम केले जात आहे. काही पर्यटकांची कालिका धाम, जम्मू येथे राहण्याची व्यवस्था केली गेली. अमरावती येथील सुमारे १४ पर्यटक येथे थांबले होते. काही पर्यटक मिळेल त्या व्यवस्थेने जम्मूवरून दिल्लीकडे रवाना झाले असून, त्यांची दिल्ली येथे व्यवस्था करण्यात येत आहे. दिल्लीत महाराष्ट्र सदनात प्रवाशांच्या याद्या सातत्याने तयार केल्या जात आहेत.