पुणे : 'अवघाचा संसार सुखाचा करीन ! आनंदे भरीन तिन्ही लोक 'जाईन गे माये तया पंढरपुरा ! भेटेन माहेर आपुलिया !!' संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगवाणीचा प्रत्यय बुधवारी अलंकापुरीत आला. टाळ-मृदंगाचा निनाद, 'माऊली-माऊली'चा अखंड जयघोष आणि रिमझिमणाऱ्या पावसाच्या सरींमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १९५ व्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्याने पंढरीची वाट धरली. भक्ती, शक्ती आणि परंपरेचा हा त्रिवेणी संगम अनुभवण्यासाठी दीड लाखांहून अधिक वैष्णवांचा मेळा अलंकापुरीत दाखल झाला होता.
पहाटेपासून विधीवत धार्मिक कार्यक्रम या वैभवी सोहळ्याची सुरुवात पहाटे चार वाजता मंदिरात झालेल्या घंटानादाने झाली. त्यानंतर माऊलींच्या संजीवन समाधीला पवमान अभिषेक, पंचामृत पूजा आणि दुधआरती करण्यात आली. या विधीनंतर समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले, जिथे लाखो वारकऱ्यांनी माऊलींचे दर्शन घेऊन नतमस्तक झाले. दुपारी बाराच्या सुमारास माऊलींना महानैवेद्य अर्पण करण्यात आला आणि त्यानंतर संपूर्ण मंदिर परिसर पाण्याने स्वच्छ करून प्रस्थान सोहळ्याची पूर्वतयारी करण्यात आली.
माऊलींच्या पवित्र पादुका पालखीत विराजमान
मुख्य प्रस्थान सोहळ्याला अडीच वाजता सुरुवात झाली. मानाच्या १ ते ४७ दिंड्यांमधील प्रत्येकी ५० वारकऱ्यांना मुख्य महाद्वारातून मंदिरात घेण्यास सुरुवात झाली. सव्वाचारला दोन्ही मानाच्या अश्वांनी मंदिरात प्रवेश केला. सव्वापाचला संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि हैबतबाबा यांच्यावतीने माऊलींची आरती करण्यात आली. मानकऱ्यांना नारळ-प्रसाद देऊन माऊलींच्या पादुका पालखीत विराजमान करण्यात आल्या.
यंदा माऊलींच्या पालखी मार्गात बदल
अतिवृष्टी व इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे यंदा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा मार्ग बदलण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. मागच्या तीन ते चार दिवसांपासून देहू व आळंदी पट्ट्यात मोठा पाऊस होत आहे. इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीतील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. पुलांचे जोपर्यंत स्ट्रक्चरल ऑडिट वा तांत्रिक तपासणी होत नाही, तोपर्यंत पुलावरून पालखी घेऊन जाणे जोखमीचे आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाने पालखी जाणार असल्याचे सोहळाप्रमुख अँड. राजेंद्र उमाप यांनी सांगितले.