संग्रहित छायाचित्र  
महाराष्ट्र

पुणे-बंगळुरू महामार्गासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम; आ. डॉ. अतुल भोसले यांची लक्षवेधी; सहापदरीकरणाचा मुद्दा विधानसभेत गाजला

नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील कराड परिसरातील रखडलेल्या राष्ट्रीय सहापदरीकरणाच्या कामाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. कराड दक्षिणचे भाजप आमदार व जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडत शासनाचे लक्ष वेधले.

Swapnil S

रामभाऊ जगताप / कराड

नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील कराड परिसरातील रखडलेल्या राष्ट्रीय सहापदरीकरणाच्या कामाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. कराड दक्षिणचे भाजप आमदार व जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडत शासनाचे लक्ष वेधले. आ. डॉ. भोसले यांनी सांगितले की, पुणे-बंगळुरू महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र कराड येथील कोयना नदीवरील पुलापासून नांदलापूरपर्यंतच्या उड्डाणपुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून अत्यंत कासवगतीने सुरू आहे. अर्धवट व रेंगाळलेल्या कामामुळे हा महामार्ग अक्षरशः अपघातांचा सापळा ठरत असून, आतापर्यंत १०० हून अधिक अपघात घडले असून त्यात सुमारे ५४ नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

एका अलीकडेच घडलेल्या एका गंभीर अपघाताचा उल्लेख करताना आ. भोसले म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथील महाविद्यालयाची बस सहलीसाठी कणकवली येथे गेली होती. परतीच्या प्रवासात कराड तालुक्यातील वाठार गावाजवळ महामार्गावर खोदलेल्या खोल खड्ड्यात बस कोसळून भीषण अपघात झाला. बसमध्ये ४० विद्यार्थी होते. यापैकी ६ विद्यार्थ्यांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागले, तर २ विद्यार्थ्यांची प्रकृती अतिगंभीर होती. मात्र कृष्णा हॉस्पिटलच्या रुग्णवाहिका वेळेत घटनास्थळी पोहोचल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. तथापि, महामार्गावरील असुरक्षिततेचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे, असे त्यांनी सांगितले.

आ. डॉ. भोसले यांनी थेट प्रश्न उपस्थित करत सांगितले की, या उड्डाणपुलाच्या कामाची नेमकी अंतिम मुदत काय आहे ? यापूर्वी ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण होईल, असे सभागृहात सांगण्यात आले होते. मात्र डिसेंबर संपत आला तरीही प्रत्यक्षात काम अपूर्ण आहे. उड्डाणपुलाचे ८३ टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात कामगार, प्रोजेक्ट इन्चार्ज दिसत नाहीत. सर्व्हिस रोडची अवस्था अत्यंत दयनीय असून त्याच्या दुरुस्तीचे कामही रामभरोसे सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

तसेच वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या व वारंवार सूचना देऊनही दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) मार्फत कोणती कारवाई केली जाणार? याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस होणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, अपघाताच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सिमेंटचे बॅरिकेड्स लावण्यात आले असल्याचे सांगून, महामार्गावरील सर्व सुरक्षा उपाययोजनांची पुन्हा तपासणी करण्याचे निर्देश NHAI अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उड्डाणपुलाचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासनही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

सातारा-कागल राष्ट्रीय महामार्गाचे काम केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. काही ठेकेदारांकडून दिरंगाई झाली असल्याचे मान्य करत, या संदर्भात केंद्र सरकारशी आधीच पत्रव्यवहार करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत या महामार्गाचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित ठेकेदारांना १५ दिवसांचा अंतिम कालावधी देण्यात आला असून, या कालावधीत समाधानकारक प्रगती न झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री सार्वजनिक बांधकाम

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये