पुणे : २६ वर्षीय व्यावसायिक केतन विशाल अगरवाल याचा खून झाल्याचे उघड झाल्याने विद्येचे माहेरघर व आयटी सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. केतन यांची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यात गेल्या सात महिन्यांमध्ये २००० हून अधिक वेळा फोनवर संवाद झाला असून या दोघांनी मिळून हा कट रचल्याचे पुरेसे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. दरम्यान सियाला हे लग्न करायचे नव्हते तर तिने तसे स्पष्ट का सांगितले नाही असा शोकसंतप्त सवाल केतनच्या वडिलांनी केला आहे. तर या प्रकरणात आपल्या मुलाचा काहीही संबंध नसल्याचा दावा चेतनच्या वडिलांनी केला आहे.
लोहगड किल्ल्यावरून ४०० फूट उंचावरून पडून केतनचा मृत्यू झाला होता. आरंभी अपघात असल्याचे वाटत असताना नंतरच्या तपासात हा नियोजनबध्द खून असल्याचे उघड झाले. विशेषतः लोहगडावरील तापमान ३३ अंश सेल्सिअस इतके असताना त्यावेळी हुडी घातलेला एक तरुण सीसीटीव्हीमध्ये आढळल्याने व तो चेतन असल्याचे निष्पन्न झाल्याने तपासाला गती आली.
केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी या घटनेला धक्कादायक विश्वासघात म्हटले आहे. "तिला माझ्या मुलाशी लग्न करायचे नसेल तर तिने सरळ नकार द्यायला हवा होता. आम्ही तातडीने लग्न रद्द केले असते," असे ते म्हणाले. त्यांनी या प्रकरणाचा जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, केतनच्या बहिणीला सुरुवातीपासूनच हा अपघात नसल्याचा संशय होता. अंत्यसंस्कारानंतरही तिने या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवला. घटनेनंतर चार दिवसांनी सिया गोयल अग्रवाल कुटुंबाच्या घरी सांत्वनासाठी आली असता, केतनच्या बहिणीने तिच्याकडे सविस्तर विचारणा केली. तिच्या उत्तरांमधील विसंगतींमुळे कुटुंबाचा संशय आणखी वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.
चेतनच्या वडिलांचा बचाव
दुसरीकडे, चेतन चौधरीचे वडील बाबूलाल चौधरी यांनी आपल्या मुलावरील आरोप फेटाळले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, चेतनने त्यांना आपण केतनपासून दूर उभा असल्याचे सांगितले होते. "केतनच्या सर्वात जवळ सिया उभी होती. तिने त्याला ढकलले की नाही, हे मला माहीत नाही; मात्र चेतन दूर होता," असे ते म्हणाले. बाबूलाल चौधरी यांनी असा आरोपही केला की, सुरुवातीला पोलिसांनी हे प्रकरण फसवणुकीशी संबंधित असल्याचे सांगितले होते आणि मुलाला काही तासांत सोडण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र दुसऱ्या दिवशी त्याला खुनाच्या आरोपाखाली अटक झाल्याचे समजले.