महाराष्ट्र

"गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन"; पुण्यातील कोयतागँगचा व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

पुण्यातील ‘कोयता गँग’चा धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून, हा व्हिडिओ शेअर करत आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणेकरांच्या सुरक्षेबाबत थेट सवाल केला आहे. त्यांनी "गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन" असा टोलाही लगावला आहे.

नेहा जाधव - तांबे

शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे गेल्या काही काळापासून गुन्हेगारीने वेढले आहे. जमीन हडपणे, भररस्त्यात कोयत्याची दहशत, दिवसाढवळ्या खून, गँगवॉर आणि अपघातांचे वाढते प्रमाण; या घटनांमुळे पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच आता पुण्यातील ‘कोयता गँग’चा धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून, हा व्हिडिओ शेअर करत आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणेकरांच्या सुरक्षेबाबत थेट सवाल केला आहे. त्यांनी "गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन" असा टोलाही लगावला आहे.

हॉटेल चालकाची लूट

रोहित पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय, की बुधवारी (दि. १९) रात्री चार-पाच जणांनी हातात कोयते घेऊन एका हॉटेलमध्ये धुमाकूळ घातला. हॉटेल चालकाला धमकावत त्यांनी रोकड लुटली आणि धारदार शस्त्राच्या जोरावर दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या प्रकारावर पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्र्यांना सवाल

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला आहे.
"पुणेकरांनी किती दिवस दहशतीत राहायचं? भयमुक्त पुणे करण्यासाठी शक्य ती सर्व पावलं उचलण्याच्या सूचना मुख्यमंत्री पोलीस प्रशासनाला देणार की नाही?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

याच पोस्टच्या सुरुवातीलाच "गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन" असा उल्लेख करत त्यांनी जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना मिळालेल्या क्लीनचिटवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार यांनी X वर व्हिडिओ शेअर करत म्हटले, "पुण्यात रात्री हातात कोयता घेऊन हॉटेल चालकाला लुटण्याचा आणि धमकावल्याचा प्रकार म्हणजे पुण्याच्या कायदा व सुव्यवस्थेचे बारा वाजल्याचं निदर्शक आहे.. चार–दोन टग्यांना पकडून चौका-चौकात ‘नव पुण्याचे शिल्पकार’ म्हणून बॅनरबाजी करणारे मुख्यमंत्री यावर काही बोलणार की नाही? रात्रंदिवस पुण्यात #कोयता_गॅंग ची दहशत कायम असून, हे सत्य मुख्यमंत्री नाकारू शकत नाहीत. पुणेकरांनी किती दिवस दहशतीत रहायचं? भयमुक्त पुणे करण्यासाठी शक्य ती सर्व पाऊलं उचलण्याच्या सूचना मुख्यमंत्री पोलीस प्रशासनाला देणार की नाही? आणि पुणेकरांसाठी निर्भय वातावरण निर्माण करणार की नाही?"

Nagpur : जलशुद्धीकरण केंद्रात मध्यरात्री क्लोरीन वायूची गळती; ४० हून अधिक जण रुग्णालयात दाखल, VIDEO

'खेलो मुंबई' ॲपद्वारेच होणार नोंदणी; ॲडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ धोरण लवकरच लागू; पालिका सभागृहाची मंजुरी

Ulhasnagar: घरे-दुकानांवरील 'रुंदीकरणाची टांगती तलवार' दूर होणार; ३६ ऐवजी २४ मीटरचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे

माथेरानमध्ये साथीच्या आजारांचा उद्रेक; दररोज ३० ते ४० रुग्णांवर उपचार; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

कोळंबीसह ओल्या बोंबीलची आवक वाढली; मासळी बाजारात ग्राहकांची गर्दी; खवय्यांमध्ये उत्साहाचे वातावरण