महाराष्ट्र

पुण्यात लाखो वैष्णवांचा मेळा दाखल

Swapnil S

पुणे : टाळ, चिपळ्यांचा घणघणाट, मनामनात भक्तीरस निर्माण करणारा मृदंगनाद, अभंगावर डोलणारे वारकरी, हवेत फडफडणाऱ्या भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, कपाळी चंदनाचा टिळा, गळा तुळशी माळा आणि मुखी ज्ञानोबा, तुकोबाचा जयघोष असे भक्तीमय वातावरण. पालखी मार्गावरील रांगोळ्यांच्या पायघड्या, चौकाचौकांत साकारण्यात आलेल्या भव्य रांगोळी, रस्त्यांच्या दुतर्फा स्वागत करणारे बॅनर, फ्लेक्स आणि रंगीबेरंगी फुलांनी सजविलेले पालख्यांचे रथ दृष्टीपथास पडताच पुणेकरांनी मनोभावे घेतलेले दर्शन, अशा प्रसन्न व उत्साही वातावरणात रविवारी पुण्यनगरीत लाखो वैष्णवांचा मेळा दाखल झाला.

लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या जगदगुरू संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालख्यांचे वैष्णवांच्या मेळ्यासह पुण्यात आगमन झाले. वैष्णवांचा महासागर आणि ज्ञानोबा-तुकारामाच्या गजराने अवघे शहर दुमदुमले. पालख्या दृष्टीपथात पडताच पुणेकर मनोभावे हात जोडून कृतार्थ झाले. सकाळपासूनच पुणेकरांना पालखी दर्शनाची आस लागली होती. त्यामुळे पालखी मार्गासह संपूर्ण शहरात स्वागताची लगबग सुरू होती. दुपारी देहू वारकरी शहरात ये‌ण्यास सुरूवात झाली आणि पुणेकरांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पालखी मार्गावर पुणेकर वारकऱ्यांच्या सेवेत रमले.

पालख्यांच्या दर्शनासाठी पुणेकर दरवर्षी आतुर असतात. यंदाही पालखी दर्शनाची ओढ पुणेकरांना लागली होती. संतांच्या पालख्या डोळ्यात साठविण्यासाठी पालखी मार्गावर पुणेकरांनी दुतर्फा गर्दी केली होती. दरवर्षीप्रमाणे, यंदाही दोन्ही पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची आदर्शवत स्वयंशिस्त अनुभवायला मिळाली. पाटील इस्टेट चौकात पालख्यांचे आगमन होताच पुणेकरांनी पुष्पवृष्टी करीत मोठ्या भक्‍तिभावाने पालख्यांचे स्वागत केले. यावेळी जमलेल्या भक्तांनी तसेच वारकऱ्यांनी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या नामाचा जयघोष केला. या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले.

शहरात सकाळपासूनच ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. दुपारनंतर पाऊस थांबला. मात्र., ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता. मात्र, उत्साह कायम होता. तुकोबांची पालखी पिंपरीहून, तर माऊलींची पालखी आळंदीतील गांधी वाड्यातून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. वारकरी टाळ-मृदंगांच्या घणघणाटासह अभंगांच्या तालावर आनंदाने नाचू-डोलू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. तुकोबांच्या पालखीने दुपारी दापोडीत विसावा घेतला. त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली.

सायंकाळी ५.५ वाजता रंगीबेरंगी फुलांनी सजविलेला चांदीचा रथ पाटील इस्टेट चौकात पुणेकरांच्या दृष्टिपथास पडला. तुकोबांची पालखी आणि रथातील पादुका दिसताच भाविक कृतकृत्य झाले. काहींना पादुका दर्शनाचे भाग्य लाभले. तुकोबांच्या आगमनानंतर माऊलींच्या पालखी दर्शनासाठी भक्तांना सुमारे पावणेदोन तास वाट पाहावी लागली. सायंकाळी ६.५० वाजता आकर्षक फुलांनी सजविलेल्या रथातून माऊली प्रकटले अन् भाविकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. माऊलींच्या पादुकांवर माथा टेकविण्यासाठी एकच झुंबड उडाली. पादुकांचे दर्शन काहींनाच प्राप्त झाले. मात्र, धन्यत्वाचा अनुभव सर्वांनीच घेतला.

फर्ग्युसन रस्त्यावर ठिकठिकाणी वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावण्यात आले होते. सामाजिक संस्था, मंडळे, राजकीय व्यक्ती, खासगी कार्यालयांतर्फे वारकऱ्यांना खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. टिळक चौकातही पालख्यांचे स्वागत करणारी रांगोळी साकारण्यात आली होती. संपूर्ण पालखी मार्गावर पुणेकर वारकऱ्यांच्या सेवेत दंग झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. तुकाराम महाराजांची पालखी नानापेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर येथे; तर माऊलींची पालखी भवानी पेठेतील विठोबा मंदिर येथे रात्री उशिरा विसावली.

...त्या मुलांची दिंडी ठरले आकर्षण

दरवर्षी राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले दिंडीत सहभागी होत असतात. यंदाही पालखी सोहळ्यात या मुलांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ‘आत्महत्या करू नका’ असा हातात फलक घेऊन संदेश देत ही मुले चालत होती. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या दिंडीने पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले. दिंडीतील मुलांनी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्‍वर माऊलीच्या नावाचा जयघोष करत. शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, असा संदेशही दिला.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला