संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

अजित पवार अपघात प्रकरण : रोहित पवार आज पुणे CID कार्यालयात जाणार

पुण्यातील सीआयडी कार्यालयात भेट देऊन तपासाची सद्यस्थिती जाणून घेणार आहेत. तसेच अपघात प्रकरणाची नवीन माहिती आणि कागदपत्रे सीआयडीकडे सादर करणार आहेत.

Krantee V. Kale

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताला तीन महिने पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार मंगळवारी सकाळी १० वाजता पुण्यातील सीआयडी कार्यालयात भेट देऊन तपासाची सद्यस्थिती जाणून घेणार आहेत. तसेच अपघात प्रकरणाची नवीन माहिती आणि कागदपत्रे सीआयडीकडे सादर करणार आहेत.

यासंदर्भात रोहित पवार यांनी सोशल माध्यमातून माहिती दिली. ते म्हणाले, अजितदादांच्या अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्याच्या मागणीला तीन महिने होत आहेत. केंद्रीय गृहमंत्र्याना भेटून सीबीआय तपासाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनालाही एक महिना लोटला आहे. काहीही कार्यवाही न झाल्याने सर्वसामान्य जनतेत याविषयी प्रचंड नाराजी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोठे नेते आहेत. कदाचित इतर राज्यांच्या निवडणूक प्रचारात ते व्यस्त असतील. परंतु आता निवडणुकादेखील झाल्या आहेत, त्यामुळे येत्या दहा दिवसांत सीबीआय तपास तसेच इतर प्रश्नांच्या संदर्भात कार्यवाही होईल, ही अपेक्षा आहे. सीआयडी नेमके काय करत अहे, हेदेखील कळायला मार्ग नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.

गेल्या २८ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. हा अपघात की घातपात, याबद्दल अजूनही जनतेच्या मनात शंका आहे. रोहित पवार यांनी हा प्रश्न सातत्याने लावून धरत चौकशीची मागणी केली आहे, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही याबाबत आपल्या मनात शंका असून, सत्य समोर यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सीआयडी कार्यालयातील रोहित पवार यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Mumbai : कोस्टल रोडवरील बोगद्यात धावत्या कारला आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची धावपळ, वाहतूक विस्कळीत, Video

पालकांचं क्षणभर दुर्लक्ष... अन् ४ वर्षीय चिमुकली थेट पहिल्या मजल्यावरून खाली; VIDEO व्हायरल

सरकारी बँकांचे कमिशन वाढले; विमा उत्पादनांच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ

जुलैच्या पावसाने खरीपाला दिला वेग; राज्यात ६७ टक्के पेरण्या पूर्ण

Pune : वारकरी सेवेची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये नोंद; दिवसभरात ३२६४ वारकऱ्यांच्या पायांची केली मालिश, योग विद्या धामने केला विश्वविक्रम