संग्रहित छायाचित्र  
महाराष्ट्र

संभाजीनगरचा पाणीप्रश्न पेटणार! थकबाकी भरली नाही तर १६ मार्चपासून पाणीपुरवठा बंद; जायकवाडी धरणाची ६४ कोटींची थकबाकी

शहरातील पाणीप्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जायकवाडी प्रकल्पातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर आता टांगती तलवार आली असून ६४ कोटी ९७ लाख रुपयांची थकबाकी तातडीने भरा, अन्यथा १६ मार्चपासून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असा कडक इशारा पाटबंधारे विभागाने संभाजीनगर महापालिकेला दिला आहे.

Swapnil S

सुजित ताजणे / छत्रपती संभाजीनगर

शहरातील पाणीप्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जायकवाडी प्रकल्पातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर आता टांगती तलवार आली असून ६४ कोटी ९७ लाख रुपयांची थकबाकी तातडीने भरा, अन्यथा १६ मार्चपासून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असा कडक इशारा पाटबंधारे विभागाने संभाजीनगर महापालिकेला दिला आहे.

पैठण येथील जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा केला जातो. या पाण्यासाठी महापालिकेला दरमहा पाटबंधारे विभागाकडे पाणीपट्टी जमा करावी लागते. मात्र, महापालिकेकडून ही रक्कम वेळेवर भरली जात नसल्याने थकबाकीचा आकडा तब्बल ६४ कोटी ९७ लाख ९६ हजार रुपयांवर पोहोचला आहे.

लेखी नोटीस बजावली

याच पार्श्वभूमीवर जायकवाडी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महापालिकेला लेखी नोटीस बजावत १५ मार्चपर्यंत संपूर्ण थकबाकी भरण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा १६ मार्चपासून शहराचा पाणीपुरवठा थांबवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महापालिकेकडून वसुली अत्यल्प

महापालिकेने चालू आर्थिक वर्षात पाणीपट्टी वसुलीसाठी २५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात सुमारे १०० कोटी रुपये थकबाकीचे आहेत. मात्र, १ एप्रिल ते २ मार्चदरम्यान मनपाला फक्त १८ कोटी ४५ लाख ५६ हजार ४९५ रुपयांचीच वसुली करता आली आहे. महापालिकेने काही वर्षांपूर्वी पाणीपट्टी ४ हजार रुपयांवरून कमी करून २ हजार ५० रुपये केली होती. तरीही नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने वसुली रखडली आहे. शहरात सध्या १ लाख २० हजार नळ कनेक्शन मनपाच्या नोंदीत आहेत.

नागरिकांवर पाणीटंचाईचे संकट?

पाटबंधारे विभागाच्या या नोटीसमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता महापालिका प्रशासन थकबाकी कशी भरते आणि पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी काय उपाययोजना करते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Mumbai : म्हाडा लॉटरीसाठी मुदतवाढ; १४ मेपर्यंत करता येणार अर्ज, जाणून घ्या सविस्तर

प्रोबेशन कालावधी संपल्यानंतर कामावरून काढणे कायदेशीर; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

विधान परिषद निवडणूक : भाजपतर्फे विधान परिषदेसाठी जठार, कोल्हेंना उमेदवारी

पानसरेंच्या पुस्तकावरचा वाद असंवेदनशील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबईत वीजपुरवठा विस्कळीत; अनेक ठिकाणी ८ ते १० तास वीज गायब