कराड : जागतिक दर्जाचे सर्वदूर जगप्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर-पांचगणी पर्यटन स्थळांवरील पांचगणी येथील तायघाट वाहनतळ, ता.महाबळेश्वर येथे रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने व याची वार्ता वाऱ्यासारखी संपूर्ण पांचगणी परिसरात पसरताच तेथे 'त्या' बिबट्याची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. ताईघाट येथील वाहनतळाच्या ठिकाणी असलेल्या वीज वितरणाच्या ट्रान्सफॉर्मर (डीपी) जवळ बिबट्या दिसून आला. यावेळी तेथील स्थानिक रहिवाशी अनिकेत बेलोशे यांच्या निदर्शनास बिबट्या येताच त्यांनी प्रसंगावधान राखून आपल्या मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरणासह छायाचित्रणही केले.
महाबळेश्वरसह पांचगणी हि दोन्ही निसर्गसौंदर्याने नटलेली पर्यटनस्थळे असल्याने महाबळेश्वरसह पांचगणी परिसर घनदाट वनराईने वेढलेला असल्याने यापूर्वीही विविध वन्यजीवांचा वावर आढळून आला आहे. मात्र,बिबट्याचा वावर आता थेट मानवी वस्तीजवळ तसेच बंगल्यांच्या परिसरापर्यंत वाढत असल्याने ग्रामस्थ आणि पर्यटकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ताईघाट परिसरातील अनेक ठिकाणी बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्येही कैद झाल्याचे आढळून आले आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी पांगारी परिसरात बिबट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता.त्यावेळी ग्रामस्थांनी महाबळेश्वर वनविभागाकडे निवेदन देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती वनविभागाने परिसरात पिंजरा लावला होता. त्यानंतर हा पिंजरा पांगारी-भोसे सीमेपलीकडे हलविण्यात आला आणि त्याच पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला होता.सध्या पाचगणीसह ताईघाट परिसरातील विविध गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याचे चित्र आहे.त्यामुळे वनविभागाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात,अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.बट्याच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवत बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावून त्याला पकडून पुनर्वसन केंद्रात त्याची रवानगी करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.
रात्री बाहेर पडताना सतर्क राहा
बिबट्याचा वावर सातत्याने आढळून आल्यास वनविभागाने नियमानुसार आवश्यक त्या उपाययोजना करून ग्रामस्थांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करत बिबट्याच्या अचानक झालेल्या दर्शनामुळे ताईघाट परिसरातील लोकांच्यात सध्या दहशतीचे वातावरण असून,स्थानिक नागरिकांनी व पर्यटकांनी रात्री-अपरात्री घराबाहेर पडताना तसेच निर्जन भागात जाताना विशेष काळजी घ्यावी,असे आवाहनही तेथील ग्रामस्थांनी केले आहे. ताईघाट परिसरात तातडीने ट्रॅप कॅमेरे बसवावेत. तसेच वनाधिकाऱ्यांची गस्त वाढवण्याची मागणी केली.