महाराष्ट्र

सुरक्षारक्षक नेमणुकीत हजारो कोटींचा घोटाळा, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका

Swapnil S

मुंबई : शासकीय व निमशासकीय कार्यालये, महामंडळे व महापालिकांच्या ठिकाणी कायदा व नियम डावलून खासगी सुरक्षारक्षकांची करण्यात येणाऱ्या नेमणुकांना आक्षेप घेत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या खासगी नियुक्तींमुळे सरकारी तिजोरीला मोठा फटका बसत असून, कायदा धाब्यावर बसवणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश द्या, अशी मागणी या जनहित याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

खासगी सुरक्षारक्षकांच्या नेमणुकीला आक्षेप घेत गर्जना श्रमिक संघाचे अध्यक्ष प्रकाश बेलवडे यांनी अ‍ॅड. सायली वाणी व अ‍ॅड. प्रथमेश गायकवाड यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे.

राज्यभरात १९८१च्या महाराष्ट्र खासगी सुरक्षारक्षक (रोजगार निर्माण आणि कल्याण) कायद्याखाली सुरक्षारक्षक मंडळे कार्यान्वित करण्यात आली, तर ८ नोव्हेंबर २००६ रोजी राज्य सरकारने तसा जीआर काढून शासकीय व निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महापालिका यांच्या ठिकाणी सुरक्षारक्षक मंडळामार्फत सुरक्षारक्षकांची नियुक्ती करणे बंधनकारक केले. संरक्षण दलातून निवृत्त झालेल्या जवानांना रोजगार मिळावा हा प्रमुख उद्देश होता; मात्र प्रत्यक्षात खासगी सुरक्षारक्षकांची नेमणूक करून कायदा आणि जीआरच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. बृहन्मुंबई महापालिका, सिडको, रायगड जिल्हा परिषद आणि एमएमआरडीएने खासगी सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीबाबत निविदा काढून कायदे नियम धाब्यावर बसवले आहेत, असा दावा याचिकेत करताना कोठ्यावधी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कथित गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत निर्देश द्या, अशी विनंती याचिकेत केली आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक