भाजप आपल्या मित्रपक्षाला हळूहळू संपवतोय. नितीशकुमार यांनी वेळीच सावध होत शहाणपणाचा निर्णय घेतल्याचे सांगत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
बारामतीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “जे. पी. नड्डा म्हणतात की, देशात फक्त भाजप हा एकच पक्ष शिल्लक राहील, छोटे-छोटे पक्ष संपतील. यातून एकच स्पष्ट होते की, भाजपला मित्रपक्षाला संपवायचे आहे. नितीशकुमार यांचीही हीच तक्रार आहे. त्यामुळे नितीशकुमार यांनी वेळीच सावध होऊन शहाणपणा दाखवले,” असे मत पवारांनी मांडले.
धनुष्यबाण शिवसेनेचेच
एकनाथ शिंदे यांनी नवा पक्ष काढून नवे चिन्ह घ्यावे. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचेच असल्याचे वक्तव्यही पवारांनी केले. “एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेता येत नाही. एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर त्यांनी आपला वेगळा पक्ष काढावा व वेगळे पक्षचिन्ह घ्यावे,” असा सल्लाही पवारांनी शिंदेंना दिला.