प्रतिनिधी/मुंबई : बहुतेक जिल्ह्यांतील शेतकरी खरीप हंगामातील पेरणी, पीक लागवड व इतर शेतीविषयक कामात व्यस्त आहे. अशा शेतकऱ्यांना ते सभासद असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती विचारात घेऊन राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया पावसाचा हंगाम पूर्ण होईपर्यंत म्हणजे ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्याच्या सहकार विभागाने याबाबत गुरुवारी आदेश काढले आहेत.
सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्य शासनास पाठविलेल्या पत्रानुसार, २०२४-२५ या वर्षात राज्यातील २४ हजार ७१० सहकारी संस्थांची निवडणूक प्रलंबित असल्याचे कळविले आहे. त्यापैकी ८ हजार ३०५ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. परंतु, राज्यातील १४ जिल्ह्यात मागील वर्षाच्या सरासरीच्या १०० टक्के पेक्षा जास्त व ५ जिल्ह्यात सरासरीच्या ७० टक्के पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे बहुतेक जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील पेरणी, पीक लागवड व इतर अनुषंगिक शेतीविषयक कामात व्यस्त आहे. अशा शेतकऱ्यांना ते सभासद असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.