मुंबईः दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असतानाच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबतची चर्चा सुरू होती, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, काही आठवड्यांपूर्वी शरद पवार गटाने असाच दावा केला असता तटकरे यांनी तो फेटाळून लावला होता; मात्र आता त्यांनी स्वतः या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
या विलीनीकरणाच्या चर्चेला आपला विरोध नव्हता असेही तटकरे यांनी म्हटले आहे. मात्र विलीनीकरण कोणाचे कोणात होणार हा प्रश्न होता. तसेच विलीनीकरण झाले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील ‘रालोआ’सोबतच राहील अशी आपली भूमिका होती असे त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्ष शोकसागरात असताना ही चर्चा सार्वजनिक केल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली. दरम्यान, विलीनीकरणाबाबत पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य राहील असे महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले.