महाराष्ट्र

खेळाडूंच्या सत्कार सोहळ्यात राजकीय फटकेबाजी! 'वंदे मातरम्', 'भारत माता की जय'च्या घोषणांनी दणाणले मध्यवर्ती सभागृह

Swapnil S

मुंबई : ‘टी-२० वर्ल्ड कप’मध्ये भारतीय टीमने केलेली कामगिरी ऐतिहासिक आहे. रोहित शर्माची फटकेबाजी, सूर्यकुमार यादव याने घेतलेला कॅच कायम आठवणीत राहणार आहे. भारतीय टीमच्या कामगिरीचे जगभरात कौतुक होत आहे. दोन वर्षांपूर्वी आमच्या ५० जणांच्या टीमने विकेट काढली. त्याचीही आठवण काही जणांच्या मनात कायम राहिली आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता लगावला. विधान भवनात भारतीय टीमचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी राजकीय फटकेबाजी चांगलीच रंगली. भारतीय टीमच्या कामगिरीबद्दल राज्य सरकारकडून ११ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. दरम्यान, ‘वंदे मातरम्, भारत माता की जय..’ या घोषणांनी मध्यवर्ती सभागृह दणाणले.

टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्मासह त्याचे सहकारी सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, प्रशिक्षक पारस म्हांब्रे, संघ व्यवस्थापक अरुण कानडे यांचा शुक्रवारी विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात विशेष सत्कार करण्यात आला.

खचाखच भरलेले हे मध्यवर्ती सभागृह क्रिकेटच्या जल्लोषाने दणाणून गेले. भारतीय राष्ट्रध्वज उंचावून सभागृहात ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणाही घुमल्या. ‘...हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला’ या क्रिकेटमधीलच विक्रमादित्य लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या आवाजातील गाण्याने आणि हिंदी चित्रपट 'चक दे इंडिया..!'च्या जल्लोषी सुरांनी सभागृह सुरुवातीपासूनच निनादून गेले. यातच टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि सहकाऱ्यांचे आगमन होताच सभागृहातील घोषणा आणखी टिपेला पोहोचल्या.

या विशेष समारंभास विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार अॅड. आशिष शेलार, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील सदस्य, क्रीडाप्रेमी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘या स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघाला हरवले तेव्हाच आपण अर्धा विश्वचषक जिंकलो. सूर्यकुमार यादवच्या अजरामर झेलमुळे आपण विश्वचषक जिंकला आणि देशभरात गेले आठवडाभर जल्लोष सुरू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. या विजयामुळे देशवासीयांचा, देशाचा गौरव झाला आहे, या भावनेने भारतीय संघाचे स्वागत करत आहेत. यासाठी गुरुवारी विजेत्या संघाच्या स्वागतासाठी मुंबईत अरबी समुद्राच्या शेजारीच जनसागर उसळला होता. आपल्या या संघाने भारतच क्रिकेटमध्ये विश्वगुरू आहे हे सिद्ध केले आहे. मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे. आपले वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारीमध्ये सहभागी झाले आहेत, तर क्रिकेटप्रेमी वारकरी याच भावनेने मुंबईकडे आले आहेत. मुंबईत दिवाळी-दसराच साजरा झाला. भारतीय संघात मुंबईकर चार खेळाडू आहेत. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार हे विजयाचे शिल्पकार आहेत याचा सर्वांनाच अभिमान आहे. विशेष म्हणजे एकही सामना न हरता या संघाने विश्वचषक जिंकला आहे, ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

भारतीय संघात मुंबईतील अनेक दिग्गज आणि महान क्रिकेटपटूंचा समावेश असल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, १९८३ चा विश्वचषक आपण कपिल देव यांनी घेतलेल्या त्या एका झेलमुळे जिंकलो होतो. कपिल देव यांचा तो झेल आणि सूर्यकुमार यादव याचा या स्पर्धेतील झेल हा भारतीयांसाठी अजरामर क्षण ठरला आहे. हे विश्वविजेतेपद प्रत्येक भारतीयांच्या आकांक्षेचे प्रतीक आहे. या मुंबईकर खेळाडूंनी आपल्या नावाप्रमाणेच भारताची विजयी पताका जगात फडकावली आहे. त्यांनी यापुढेही भारतीयांना असाच आनंदोत्सव साजरा करण्याची संधी मिळवून द्यावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.

सर्वांसाठी आनंदाचा क्षण - फडणवीस

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतीय संघाने आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आणला आहे. एका अपराजित संघाने विश्वचषक जिंकला आहे. रोहित शर्माने अद्वितीय कामगिरी करत भारतीय क्रिकेटच्या दिग्गजांच्या मांदियाळीत स्थान पटकावले आहे. रोहितने कपिल देव, महेंद्रसिंह धोनी यांच्यानंतर आपला नावलौकीक केला आहे. कर्णधार म्हणून रोहित याने संघातील सहकाऱ्यांचा जिंकलेला विश्वास हा महत्त्वाचा आहे. त्याची नेतृत्वशैली ही भारतीय संघाच्या कर्णधाराची परंपरा राखणारी आहे. मुंबईकर सर्व खेळाडू महाराष्ट्राचा अभिमान असल्याचे सांगून, आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबईत १ लाखापेक्षा जास्त क्षमतेचे आधुनिक स्टेडियम बांधण्याची सूचना त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला केली. भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी केलेली गर्दी अभूतपूर्व होती. मात्र, मुंबईकरांनी शिस्त मोडली नाही. त्यामुळे त्यांनी मुंबईकराचे अभिनंदन केले.

चमत्कार घडला - अजित पवार

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, विधानभवनात असा दिमाखदार समारंभ होतो आहे, याचे मोठे समाधान आहे. चमत्कार घडेल असे वाटत होते आणि चमत्कार घडला. आपला क्रीडारसिक आगळावेगळा आहे. मरिन ड्राइव्हला अभूतपूर्व गर्दी झाली होती. भारतीय लोक क्रिकेटवर प्रेम करतात, असे प्रेम जगात कुठेही दिसत नाही. यात अमेरिकासारखा संघही आता पुढे आला आहे. सूर्यकुमारने घेतलेला झेल हा अप्रतिमच होता. यापुढे रोहित टी-२० खेळणार नाही. पण यापुढे ज्या-ज्यावेळी आपण टी-२० पाहू, त्यावेळी रोहितची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

अभिमानाचा क्षण - ॲड. नार्वेकर

विधानसभेचे अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले की, भारतीय क्रिकेट संघाने प्रत्येकाला अभिमानाचा क्षण मिळवून दिला. क्रिकेटमुळे विधिमंडळ कामकाज करतानाही मदत होते. असे सांगत त्यांनी विधिमंडळातर्फे खेळाडूंना शुभेच्छा देऊन आगामी काळात गौरवशाली क्षण मिळवून देण्याबद्दल त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, विधानभवनात प्रथमच अशाप्रकारचा कार्यक्रम होत आहे. हा सोहळा महाराष्ट्राच्या जनतेच्यावतीने होणारा सत्कार होता. खेळाडूंच्या विजयासाठी प्रत्येक नागरिकाने शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या. या अभूतपूर्व विजयानंतर क्रिकेटसह सर्व क्षेत्रातील प्रगतीसाठी एकत्र यावे, असेही आवाहन उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते कर्णधार रोहित शर्मा याच्यासह खेळाडूंचे वैशिष्ट्यपूर्ण ट्रॉफी, विधानमंडळाचे स्मृतिचिन्ह, छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनाधिष्ठित मूर्ती, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विधानभवनाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला