गेल्या दोन वर्षांमध्ये सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने अनेक सण साधेपणाने साजरे करावे लागले. महाराष्ट्रात दहीहंडी आणि गणेशोत्सव हे उत्सव मोठ्या थाटात साजरे केले जातात. मात्र गेल्या अडीच वर्षांत कोरोनामुळे अनेक निर्बंध असल्यामुळे लोकांना हवे तसे साजरे करता आले नाहीत. यंदा हे सण थाटामाटात साजरे करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. यंदा गणेशोत्सव आणि दहीहंडीवर कोणतेही बंधन राहणार नाही. यासोबतच या कालावधीत अधिकाधिक एसटी गाड्या सोडण्यासाठी नियोजन करता यावे, यासाठी तातडीने बैठक घेण्याचे आदेश परिवहन विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे गणपतीसाठी कोकणात गावी जाणाऱ्यांची चिंता कमी झाली आहे.
गणेशोत्सव व इतर उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी आगमन व विसर्जन मार्गावरील खड्डे दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. मंडप आणि इतर परवानगी विनाविलंब करता याव्यात यासाठी एक खिडकी योजना आणि ऑनलाइन परवानगी दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.