नागपूर : विदर्भातील ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक दत्ता राघाबोजी मेघे यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ४० वर्षांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या दत्ता मेघे यांनी राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रावर आपली छाप पाडली. त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला.
ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या निधनाचे वृत्त रात्री पावणे नऊच्या सुमारास आले अन् त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. गरीब परिस्थितीतून पुढे आलेले मेघे यांनी आपल्या सौम्य, मृदूभाषेमुळे विदर्भातील राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षात केली.
राज्यसभेचे सदस्य म्हणूनही केले काम
ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांनी वर्धा लोकसभा मतदार संघाचे चार वेळा प्रतिनिधित्व केले. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत लोकसभेसह राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. ते ३ वेळा विधान परिषद सदस्यही होते. २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमच नव्हे तर सर्वच निवडणुकीतील रणनितीचा भाग होते. परंतु त्यापूर्वी ते १९७८ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील पुलोदच्या सरकारमध्ये ते विदर्भातून मंत्री होते. तेव्हापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.
विदर्भातील तीन मतदारसंघांचे केले प्रतिनिधीत्त्व
अनेक वर्ष मंत्री, विरोधी पक्षनेता अशी पदे भूषवित १९९१ मध्ये त्यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजय संपादन केला. त्यानंतर रामटेक (१९९६ व वर्धा (१९९८) या मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले. विदर्भातील तीन मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येणारे ते विदर्भातील एकमेव नेते आहेत. वर्धा येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून त्यांनी विदर्भात अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या आहेत.
रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयाचे मोठे साम्राज्य
वर्धा येथील सावंगी मेघे येथे त्यांनी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे मोठे साम्राज्य उभे केले आहे. राजकारणात अनेक व्यक्ती नात्यापलीकडच्या असतात. त्यांच्यावर प्रचंड विश्वास असतो. ही बाब केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि दत्ता मेघे यांच्या बाबतीत दिसते.