अलिबाग: दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर समुद्रातील जलवाहतूक आणि जलक्रीडा व्यवसायावर तात्पुरती बंदी लागू करण्यात आली आहे. समुद्रातील वाढलेला धोका, प्रतिकूल हवामान आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे अनेक व्यावसायिकांनी स्वागत केले आहे.
कोकण किनारपट्टीवर जलक्रीडा आणि बोट व्यवसायावर मोठ्या प्रमाणात अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र, चार महिन्यांच्या पावसाळी कालावधीत हा व्यवसाय पूर्णपणे बंद राहत असल्याने संबंधित व्यावसायिकांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होतात. असे असले तरी पर्यटकांच्या जीवित सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याची भावना व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
एका जलक्रीडा व्यावसायिकाने सांगितले की, पावसाळ्यात समुद्राचा अंदाज घेणे अत्यंत कठीण असते. अचानक वेगवान वारे, उंच लाटा आणि सतत बदलणारे हवामान यामुळे अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे प्रशासनाच्या नियमांचे पालन करून आम्ही आमच्या बोटी सुरक्षित स्थळी हलवत आहोत.
दरम्यान, प्रशासनाकडून किनारपट्टी भागातील सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्यात येत असून पर्यटकांनीही नियमांचे पालन करून समुद्रकिनारी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाळ्याचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा जलक्रीडा आणि पर्यटन व्यवसाय पूर्ववत सुरू होईल, अशी अपेक्षा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. तसेच आगामी पर्यटन हंगामासाठी आवश्यक देख भाल, दुरुस्ती आणि सुरक्षा तपासणीची कामे या कालावधीत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहितीही संबंधित व्यावसायिकांकडून देण्यात आली.