पुणे : नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचे शनिवारी अंदमान आणि निकोबार बेटांवर आगमन झाले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने अंदमान समुद्रासह बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला असून, श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांच्या विविध भागांत जोरदार पावसाची नोंद करण्यात आली आहे. यावर्षी मान्सून अगदी वेळेवर दाखल झाला असून त्याचे संकेत सकारात्मक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, सध्या अंदमान परिसरात ताशी ३५ ते ४५ किलोमीटर वेगाने पश्चिमेकडील वारे सक्रिय झाले आहेत. पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सून आणखी पुढे सरकण्यासाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक वातावरण निर्माण झाले असून, आग्नेय अरबी समुद्र अंदमानात पाऊस आला, कोकणात ६ जूनला आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात मान्सूनची प्रगती वेगाने होणे अपेक्षित आहे.
केरळममध्ये २६ मे रोजी मान्सून धडकणार
साधारणपणे १ जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होणारा मान्सून यावर्षी चार दिवस आधी, म्हणजेच २६ मे रोजीच केरळ किनारपट्टीवर धडकण्याची दाट शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्याने मान्सूनचा वेग वाढला असून, कोणत्याही चक्रीवादळाचा अडथळा नसल्याने हा प्रवास सुरळीत राहण्याचा अंदाज आहे.
६ जूनला कोकणात
महाराष्ट्रातील पावसाच्या वाटचालीबाबतही हवामान विभागाने महत्त्वाचे संकेत दिले आहेत. ५ जूनपर्यंत मान्सून गोव्यात पोहोचण्याची शक्यता असून, ६ जूनला तो कोकणात आणि ७ जूनपर्यंत पुण्यात दाखल होऊ शकतो.
यंदा सरासरीपेक्षा काहीसा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यावर्षी देशात ८० सेंटीमीटर पावसाचा अंदाज असून, दीर्घकालीन सरासरी ८७ सेंटीमीटरच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे.