मुंबई : गुंतवणुकीच्या नावाखाली सुमारे १५० कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणी ठाण्यातील एका कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांसह १४ जणांवर शिवडी येथील रफी किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळ येथे राहणारे राजेश कृष्णा सावंत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला आहे. या कंपनीची वडाळा येथे शाखा आहे. आरोपींनी २०११ पासून ते २०२३ दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार केलेला आहे. राजेश सावंत यांनी २५ हजार रुपयाची गुंतवणूक केली होती. आरोपींनी कंपनीच्या मुदत ठेवी, निवृत्ती वेतनासह विविध योजनांमध्ये चांगला परतावा मिळेल, असे दाखवले होते. कालावधी पूर्ण होऊन परतावा परत न केल्याने गुंतवणूकदारांनी पोलिसांत तक्रार दिली, असे शेकडो तक्रारदार आहेत. कालिकाई संपर्क सेवा समितीचे सचिव राजेश सावंत यांनी याबाबत महानगर दंडाधिकारी, शिवडी कोर्ट येथे येथे याचीका दाखल केली होती. कोर्टाच्या आदेशानुसार, सदर तक्रार पोलिसांनी दाखल केली आहे. यामध्ये एकूण १५० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे सावंत यांचे म्हणणे आहे.