मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी २३ हजार ९२६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी २३८ वातानुकूलित लोकल उपलब्ध होतील, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
दिल्ली येथून ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत वैष्णव यांनी विविध राज्यांसाठी अर्थसंकल्पात झालेल्या तरतुदीची माहिती दिली. ते म्हणाले की, “मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सुमारे ३,२०० हून अधिक लोकल धावतात. प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी २३८ वातानुकूलित लोकल चालवण्यात येणार आहेत. या नवीन वातानुकूलित लोकलमध्ये आरामदायी आसन व्यवस्था, आधुनिक रचना, ऑक्सिजन नियंत्रक व्यवस्था असणार आहे. तसेच मुंबई महानगरातील रेल्वे प्रवाशांसाठी १६ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. हे प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील.”
“महाराष्ट्राला दोन बुलेट ट्रेन प्रकल्प मिळाले आहेत. यामध्ये मुंबई ते पुणे आणि पुणे ते हैदराबाद या दोन्ही ट्रेनमुळे प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते पुणे अंतर केवळ ४८ मिनिटांत पूर्ण होणार आहे. तर पुणे-हैदराबाद प्रवासासाठी १ तास ५५ मिनिटे लागतील. बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा पुढील वर्षी सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील एका टनेलचे काम ३ फेब्रुवारीला पूर्ण होणार आहे,” असे रेल्वेमंत्री म्हणाले.
राज्यात दोन हायस्पीड कॉरिडॉर
महाराष्ट्रासाठी दोन महत्त्वाच्या हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. राज्यात सध्या १२ जोड्या ‘वंदे भारत’ आणि पाच जोड्या ‘अमृत भारत’ गाड्या धावत असून, प्रवाशांना आधुनिक, वेगवान आणि सुरक्षित रेल्वे सेवा उपलब्ध होत आहे.
वाढवण बंदराला थेट रेल्वेने जोडणार
‘पूर्व-पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ प्रकल्पाचीही घोषणा करण्यात आली आहे. या मार्गामुळे महाराष्ट्रातील वाढवण बंदराला थेट रेल्वेने जोडण्यात येणार असून, हे बंदर जागतिक पातळीवरील सर्वाधिक मोठ्या बंदरांपैकी एक ठरण्याची अपेक्षा आहे, असेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.