मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुका झाल्यास उत्तर मुंबई विभागातून महायुतीचे ४० नगरसेवक निश्चित जिंकून येणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला. मुंबई महानगरपालिकेत शनिवारी भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये उत्तर मुंबईतून मिळालेले यश पाहता ४० सहज जिंकता येतील आणि उत्तर मुंबईत महायुतीचेच नगरसेवक असतील, असा विश्वास गोयल यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला उत्तर मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. या ठिकाणी महायुतीचे पाच आमदार निवडून आले. या मतदारसंघांमध्ये तसेच आपल्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीला मानणारा मतदार वर्ग आहे. तसेच हिंदुत्वाला मानणारा आणि विकासाला मत देणारा मतदार या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचे ४० नगरसेवक या विभागातून निश्चित निवडून येतील, असा दावा पियूष गोयल यांनी केला आहे. या संदर्भात आपण महानगरपालिका स्तरावर सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करत असल्याचे गोयल यांनी यावेळी स्पष्ट केले.