मनोज रामकृष्णन
मुंबई : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे होणाऱ्या यंदाच्या महाकुंभ सोहळ्याला ४५ कोटी भाविक येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. २०१९ मध्ये प्रयागराजमध्ये २० कोटी भाविक आले होते.
यावर्षी प्रदूषण कमी करण्यासाठी आणि कचरा टाळण्यासाठी एकाचवेळी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात येणार असून नदीत येणारे सांडपाणी वळवून जलप्रदूषण रोखले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
प्रयागराज महाकुंभ १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणार आहे. तो पूर्वीच्या मेळाव्यापेक्षा अधिक मोठा असेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. भाविकांच्या संख्येच्या आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने हा सोहळा महत्त्वाची ठरेल, असे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी रविवारी मुंबईत सांगितले.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या महोत्सवासाठी निमंत्रण देण्यासाठी पाठक मुंबईत आले होते. यानंतर पत्रकारांना माहिती देण्यासाठी त्यांच्याबरोबर उत्तर प्रदेशचे मत्स्यव्यवसाय मंत्री संजय निषाद हेही उपस्थित होते.
मत्स्यव्यवसाय मंत्री संजय निषाद यांनी सांगितले की, भाविकांच्या सोयीसाठी अभूतपूर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. यात ९०० हून अधिक विशेष गाड्या, ७ हजार बस, विशेष रुग्णालये आणि भाविकांसाठी तंबू आदींचा समावेश आहे. महोत्सव सुरक्षिततेकरिता नवीन तंत्रज्ञान वापरले जाणार असून यामध्ये हरविलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी ॲट्रिब्युट-बेस्ड सर्च यंत्रणा, प्रत्येक भाविकासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन ब्रेसलेट आणि मोबाइल ॲप ट्रॅकिंगचा समावेश आहे.
महाकुंभ महासोहळा २०२५
कालावधी : १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५
अपेक्षित भाविक : ४५ कोटी भाविक भेट देण्याची शक्यता
आरोग्य सुविधा : १०० खाटांचे रुग्णालय, वैद्यकीय सुविधा
घाट : गंगा-यमुनेच्या ४४ घाटांवर भाविकांची उपस्थिती राहणार
पर्यावरणपूरक उपक्रम : एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी,
तीन लाख झाडे लावणार