मुंबई : पॅरोलवर सुटल्यानंतर पळून गेलेल्या एका वॉण्टेड आरोपीस दीड वर्षांनी अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. आनंदकुमार हरिदास चौधरी असे या आरोपीचे नाव असून, अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाच्या आदेशानंतर त्याची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. आनंदकुमार हा अंधेरीतील मालपा डोंगरी, यादव चाळीत राहत असून, तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध आरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यातील आरे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या रॉबरीच्या गुन्ह्यांत त्याला एका वर्षांच्या कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. कोरोनामुळे काही आरोपींना पॅरोल मंजूर करण्यात आला होता. त्यात आनंदकुमारचा समावेश होता. ८ मे २०२० रोजी त्याला ४५ दिवसांच्या पॅरोलवर सोडून देण्यात आले होते; मात्र तो जून महिन्यांत कारागृहात हजर राहिला नाही. तसेच तो पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यासाठी जात नव्हता. तो पळून गेल्याची खात्री होताच २० सप्टेंबर २०२२ रोजी त्याच्याविरुद्ध तळोजा कारागृहातील पोलीस शिपाई नवनाथ आबाजी सावंत यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.